माती भरताना प्रथम ती मोकळी करून त्यातील दगड वेचून घ्यावेत. मापासाठी आपल्याकडे मग असेल तर दोन मग माती त्यात अर्धा मग वाळू किंवा कोकोपिट (कोकोपिटचे ब्लॉक कोणत्याही नर्सरीत मिळतात), तसेच दीड मग गांडूळ खत, कंपोस्ट खत, शेणखत यापैकी जे मिळेल ते यांचे मिश्रण तयार करून ते कुंडीत भरावे. मिश्रणाने कुंडी भरल्यानंतर झाड लावायच्या आधी ५-६ दिवस तिला पाणी द्यावे. पाणी बाहेर येणार नाही एवढेच द्यावे. मातीतील तण उगवतील तसेच मातीपण स्थिर होईल. झाड लावताना हे तण काढून टाकावे व झाडाच्या मातीच्या आकारानुसार किंवा फांदीच्या कटिंगनुसार त्या मातीत खड्डा करून त्यात झाड लावावे. झाड नर्सरीतून आणल्यानंतर लगेच लावू नये. आपल्याकडे ५-७ दिवस तसेच ठेवून नंतर लावावे. प्रवासात पिशवीत असलेल्या मातीचा गोळा फुटून मुळांना धक्का लागण्याची शक्यता असते. ती माती स्थिर होण्याआधीच पिशवी फाडून झाड कुंडीत लावल्यास मातीचा गोळा फुटतो आणि मुळे तुटतात. यामुळे लावलेले झाड मरण्याची शक्यता असते म्हणून पिशवी ५-७ दिवस ठेवून नंतर ब्लेडने पिशवी काढून ते झाड मातीचा गोळा न फुटता अलगद कुंडीत लावावे.
आपल्याकडे मोठी गच्ची असल्यास तेथे आपण अगदी आंबा, पपई, केळी अशी झाडे लावून त्यांची फळेदेखील घेऊ शकतो. गच्चीत मोठय़ा कुंडय़ा अथवा ड्रमचा वापर आपण करू शकतो. तसेच जाडे काळे प्लास्टिक जे शेततळय़ासाठी वापरतात ते वापरून आपण आवश्यक त्या लांबी रुंदीचे वाफे गच्चीवर तयार करू शकतो. गच्चीवर वाफे करताना आधी विटा लावून त्यावर प्लास्टिक पसरावे व कडेने अपेक्षित उंचीच्या विटा लावून वाफे तयार करावे. यामध्ये मातीचे मिश्रण कुंडीत भरावे. त्या मिश्रणात शक्य असल्यास ट्रायकोडर्मा नावाची बुरशीची पावडर मिसळावी. ट्रायकोडर्मा ही बुरशी मातीमधील हानीकारक बुरशींना संपवते. तसेच मातीमधील विविध अन्नद्रव्ये झाडांना उपलब्ध करून देते.
कमी जागेत जास्त झाडे लावण्यासाठी आपण वेगवेगळय़ा उंचीवर वाढणारी झाडे एकत्र लावू शकतो. मल्टीलेअर पद्धतीने आपण एकाचवेळी विविध उत्पादने मिळवू शकतो. यासाठी तीन फूट रुंद आणि एक फूट उंचीचे विटा व प्लास्टिकचा वापर करून वाफे तयार करावेत. या वाफ्यांच्या कडेने चारी टाकोना व मध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे डबे/ड्रम मातीच्या मिश्रणाने भरनू त्यात बांबूचे तुकडे खोचून व वर दोऱ्या बांधून मांडव तयार करून घ्यावा. खालच्या वाफ्यांमध्ये भाज्या तर मांडवाच्या दोऱ्यांवर वेलींची शेती करतात. येते. पालेभाज्या ३०-४० दिवसांच्या तर काकडी कार्ली दोन महिने आणि शिराळी, दुधी भोपळी पाच ते सहा महिन्यांपर्यंत मिळतात. मांडव घालणे शक्य नसेच तर ‘इंटरक्रॉप्रिंग’ म्हणजे वेगवेगण्य़ा कालावधीप्रमाणे एक आड एक ओळींमध्ये त्यांची लागवड करावी. म्हणजे दुसरे तयार होईपर्यंत पहिले पीक तयार असते. वाफ्यांच्या कडेला वांगी, मिरची, टोमॅटो यासारखी वर्षभर चालणारी रोपे लावावीत. तर मध्ये दोन ओळी करून चवळी, मूग अशी कमी कालावधीत मिळणारी कडधान्ये लावावीत. मधल्या जागेत ६० ते ७० दिवसांत येणाऱ्या पालेभाज्या लावाव्यात.
फळे, फुले, भाज्या
गच्चीवर वाफ्यांमधून साखळी पद्धतीने पालेभाज्या लावून आपण घरापुरती भाजी उपलब्ध करून घेऊ शकतो. तसेच हंगामानुसार, बिट, मुळा, गाजर अशी कंदपिके तर टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, फ्लॉवर अशा फळभाज्याही आपण घेऊ शकतो. सर्व प्रकारचे वेल म्हणजे काकडी, घोसाळी, शिराळी, दुधी, कारली, तोंडली वाढवून त्यापासून भाज्या मिळवू शकतो. यासोबतच कोरफड, गवती चहा, पुदीना, आले, हळद इत्यादी औषधी वनस्पती घेणेही आपल्याला सहज शक्य आहे. फळांमध्ये लिंबू, पपई, आंबा, केळी, पेरू ही फळे गच्चीवर घेता येतात. फुलांमध्ये गुलाब, जास्वंद, परिजात, रातराणी, जाईजुई, मोगरा तसेच ड्रममध्ये चाफा, बकुळीचे कलम लावून आपण सुगंधी फुले घेऊ शकतो.
राजेंद्र भट