पेटपालकांचा वर्षांतील सर्वाधिक चिंतेचा ऋतुकाळ असतो उन्हाऴा. या तीन-चार महिन्यांत माणसांसोबत प्राणी आणि पक्षीही उष्णतेच्या तडाख्यात होरपळतात. इतर मोसमात भरपूर खेळणारे श्वान किंवा मांजर वैशाखवणव्यातील उन्हाच्या झळांनी कोपऱ्यात शांत पडून राहते. त्यांचे केस गळतात. आडोशाला जाऊन बसलेले पक्षी बोलावले तरी पटकन समोर येत नाहीत. आत्यंतिक नाजूक जातीच्या माशांचा मत्स्यपेटीतील अचानक मृत्यू हा केवळ तापमानात विचित्र चढ-उतार झाल्यानेही होतो. बदलत्या ऋतूप्रमाणे प्राण्यांच्या वागणुकीत होणारा बदल हा साहजिक असला तरी काही गोष्टींची काळजी घेणेही अत्यावश्यक असते. उन्हाळ्याच्या तलखीपासून प्राण्यांचे संरक्षण करणारी अनेक उत्पादने बाजारात दाखल झाली आहेत. त्यानुसार काळजी घेतल्यास प्राणी आणि प्राणीपालक दोघांचा मनस्ताप कमी होऊ शकतो.

याकडे लक्ष द्या..

उन्हाळ्यात वाढत्या पाऱ्यानुसार प्राण्यांच्या शरीराच्या तापमानात फरक होतो. त्यामुळे केस गळणे, कमी खाणे, प्राणी आळसावलेले असणे ही लक्षणे बहुतांश पेट्सबाबत घडत असतात. मात्र त्यापेक्षा अधिक लक्षात येण्याजोगे बदल प्राण्यांमध्ये दिसू लागले तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. उन्हामुळे त्वचा होरपळणे (सर्न बर्न), श्वास घ्यायला त्रास होणे, उष्माघात (सन स्ट्रोक), शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे (डिहायड्रेशन) असे माणसांमध्ये आढळणारे त्रास प्राण्यांनाही होतात. काळजी घेतल्यास त्यापासून प्राण्यांची जपणूक करता येते. याबाबत पशुवैद्य डॉ. विनय गोऱ्हे यांनी सांगितले, ‘वाढत्या उन्हाळ्याचा त्रास प्राण्यांना होऊ शकतो. मोठय़ा आकाराचे ग्रेट डेनसारख्या प्रजातीचे श्वान किंवा चपटय़ा तोंडाचे पगश्वान यांना ष्टद्धr(२२४)वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यांच्याबाबत अधिक खबरदारी घेणे आवश्यक असते. या कालावधीत श्वान खाणे कमी करतात. सध्याच्या हवामानामुळे त्यांना कोरडा कफही होतो. मात्र थोडय़ाशा देखरेखीखाली हे त्रास सहज टाळता येऊ शकतात.’

अतिरेक टाळा

उन्हाळा जाचतो म्हणून श्वानांना रोज आंघोळ घालणे. केस गळतात म्हणून ते कापून टाकणे असे प्रकार अनेक पशुपालक करतात. मात्र प्राण्यांना रोज आंघोळ घातल्यास त्यांची त्वचा कोरडी होऊन अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यातही दररोज आंघोळ घालू नये. त्याऐवजी शरीराचे तापमान कमी करण्यासाठी ओल्या फडक्याने अंग टिपता (स्पंजिंग) येऊ शकते. या काळात प्राण्यांचे केस कापून टाकणे चुकीचे आहे. त्याची लांबी कमी केल्यास चालू शकते, मात्र ते कापून टाकल्यास प्राण्यांची त्वचा उन्हाने अधिक होरपळण्याची शक्यता असते.

दाहरोधक बाजारपेठ

उन्हाचा दाह कमी करण्यासाठी अनेक उत्पादने ‘पेट शॉप्स’ आणि ऑनलाइन बाजारपेठेत दाखल झाली आहेत. त्यातील सध्या चर्चेत असलेले उत्पादन म्हणजे ‘वॉटर फाउंटन्स’. श्वानांना किंवा मांजरांना साठलेल्या पाण्यापेक्षा वाहते किंवा ताजे पाणी पिण्यास आवडते. त्यामुळे अनेकदा भांडय़ात ओतून ठेवलेले पाणी तापमान वाढलेले भासल्यास प्राणी ओरडतात किंवा पिण्याचे टाळतात. म्हणून ‘वॉटर फाउंटन्स’ बाजारात आली आहेत. प्राणी या फाउंटनच्या जवळ आला की पाणी वाहू लागते आणि प्राण्यांना पिता येते. त्यातून पाणी वाया जाण्याचे प्रमाणही कमी होते आणि प्राण्यांना कायम थंड आणि स्वच्छ पाणी मिळते. साधारण २५० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यत ही फाउंटन्स ऑनलाइन बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय सुती शर्ट, खाण्यातील नवी उत्पादनेही बाजारात आली आहेत.

नक्की काय कराल?

  • श्वानांना उन्हात फिरायला नेऊ नये.
  • सतत पाणी पिऊन प्राणी आपल्या शरीराचे तापमान आटोक्यात ठेवत असतात. प्राण्यांना दिवसभर स्वच्छ आणि थंड पाणी मिळावे.
  • उन्हाळा सुरू झाला की प्राण्यांची भूक मंदावते. अशा वेळी दिवसभर कमी खाणे दिले तरी चालू शकते. प्राण्यांचे नियमित खाणे हे रात्री किंवा अगदी सकाळी द्यावे. ते गरम असू नये, याबाबत दक्ष राहावे.
  • या मोसमात काही प्रमाणात प्राण्यांची केसगळती स्वाभाविक आहे . मात्र ते अधिक प्रमाणात गळत असतील अन् त्यानंतर त्यांच्या त्वचेवर लालसरपणा आल्यास किंवा एखाद्याच भागावरचे केस अधिक जात असल्याचे आढळल्यास पशुवैद्यकांकडे जावे.
  • मांजरांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वेळ न दडवता पशुवैद्यकांकडे न्यावे.
  • केस गळती काही प्रमाणात कमी होण्यासाठी बाजारात मिळणारी स्प्रे, पावडर्स वापरता येतील.घरात थंडावा असेल अशा ठिकाणी प्राण्यांना बसण्यासाठी जागा द्यावी.
  • पक्ष्यांच्या पिंजऱ्यातही पर्याप्त पाणी असावे. ते दिवसातून दोन वेळा बदलावे. त्याचप्रमाणे उन्हापासून पिंजरा दूर ठेवावा, शक्यतो त्यात आडोसा करावा.
  • अ‍ॅक्वेरियममधील पाण्याची पातळी सातत्याने तपासावी. त्याची स्वच्छता, शैवालाचे प्रमाण यांकडे लक्ष द्यावे. पुरेशा प्रमाणात प्राणवायू पोहोचतोय ना, शुद्धीकरण यंत्र काम करीत आहे ना, याची चाचपणी करावी.