काही वस्तू या केवळ त्याच्या ब्रॅंडच्या नावाने ओळखल्या जातात. अदिदास हा त्यातीलच एक. पादत्राणे तयार करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या ब्रँडने आपली आणखी एक नवीन ओळख निर्माण केली आहे. पर्यावरणाची वाढती समस्या लक्षात घेऊन कंपनीने एक अतिशय वेगळे आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. प्लास्टीकच्या कचऱ्याचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या नामवंत कंपनीने थेट प्लास्टीकचा वापर करत बूट तयार केले आहेत. हे ऐकून तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटले असेल. पण हे खरे आहे. २०१७ या वर्षात कंपनीने १० लाख बुटांचे जोड तयार केले. यामधून कंपनीने करोडो रुपयांचे उत्पादनही मिळवले आहे.

कंपनीने यासाठी पश्चिम आफ्रिकेमधील पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्यांशी संपर्क केला आणि समुद्रातील जवळपास ९५ टक्के प्लास्टीक जमा करत त्यापासून हे बूट बनवले. त्यानंतर २०१६ मध्ये अदिदासने समुद्रात मिळालेल्या याच प्लास्टीकपासून ७ हजार बुटांचे जोड तयार केले. आतापर्यंत यातील १० लाख जोड विकले गेल्याचे कंपनीने सांगितले आहे. याबाबत कंपनीचे अधिकारी म्हणाले, बुटाचा एक जोड तयार करण्यासाठी साधारण प्लास्टीकच्या ११ बाटल्यांचा पुर्नवापर केला जातो. कंपनीचे मुख्यालय जर्मनीमध्ये असून ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मल्टीनॅशनल कंपनी आहे. कंपनी बूटांबरोबरच कपडे आणि इतर गोष्टींचेही उत्पादन करते. युरोपमध्ये खेळाशी निगडीत उत्पादनांसाठीची ही सर्वात मोठी  कंपनी आहे.