नसरुल्लाह या फेसबुक फ्रेंडसाठी भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने आता तिचा धर्म बदलून आणि नाव बदलून त्याच्याशी निकाह केला आहे. अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव फातिमा ठेवल्याच्या बातम्या मंगळवारीच आल्या. त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणावर सचिन मीनासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरने प्रतिक्रिया दिली आहे. अंजूने फातिमा हे स्वतःचं नाव ठेवून तिच्या मित्राशी निकाह केला आहे. या प्रकरणी आता सीमा हैदरने भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंजूच्या प्रकरणावर काय म्हटलं आहे सीमा हैदरने?

अंजू ही पाकिस्तानी मित्राशी लग्न करायला भारतातून तिकडे गेली. तिने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि मग ती पाकिस्तानात गेली आहे या सगळ्यावर तुमचं काय म्हणणं आहे सीमा हैदरला विचारलं असता, सीमा म्हणाली “अंजू भारतात राहात होती. भारत हा असा देश आहे जिथे माणूस काहीही करु शकतो. कारण तसं वागण्याचं माणसाला स्वातंत्र्य असतं. पाकिस्तान असा देश आहे जिथे हे कळलं असतं की मी देश सोडला आहे तर माझ्याबरोबर काहीही बरं वाईट घडू शकलं असतं. हैदरला (सीमाचा नवरा) समजलं असतं की माझं हिंदू मुलावर प्रेम आहे तर त्याने माझी हत्या केली असती.”

महिलांना चांगली वागणूक मिळते का?

भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये महिलांना जी वागणूक मिळते त्याबाबत काय मत आहे असं विचारलं असता सीमा म्हणाली, “सिंध आणि बलोच हे असे प्रांत आहेत जिथे महिलांना काहीही आदर दिला जात नाही. सिंधमध्ये माझ्या वयाची एकही महिला शिकलेली नाही. एखाद्या महिलेची ओढणी जर डोक्यावरुन खाली आली तर तिला शिवीगाळ केली जाते. सिंध आणि बलोच महिलांसाठी नियम खूप कठोर आहेत. आम्हाला बुरखा परिधान करावा लागतो. भारतात मात्र ती स्थिती नाही. भारतात महिलांचा खूप आदर केला जातो. मी भारतात आले आहे तेव्हापासून मलाही आदराने वागवलं जातं आहे. ”

हे पण वाचा- भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू आता फातिमा, इस्लाम स्वीकारुन नसरुल्लाहशी केला निकाह

अंजूने काही दिवसांपूर्वी आपला देश सोडून पाकिस्तान गाठलं. तिथे तिने तिचा फेसबुक फ्रेंड असलेल्या नसरुल्लाहशी निकाह केला. त्याआधी तिने धर्म परिवर्तन करुन आपलं नाव फातिमा असं ठेवलं आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार नसरुल्लाह आणि फातिमा (आधीची अंजू) या दोघांनी जिल्हा न्यायालयात कायदेशीर पद्धतीने निकाह केला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अंजूला तिच्या सासरी पाठवण्यात आल्याचं पाकिस्तानी पोलिसांनी सांगितलं. आज तकने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

अंजूच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?

“अंजू जयपूरला जाते हे सांगून पाकिस्तानला गेली हे मला सोमवारी कळलं आहे. माझा मुलगा डेव्हिडने मला सांगितलं की दीदी (अंजू) पाकिस्तानला गेली. मला याबाबत काही माहिती नाही. तिचं लग्न झाल्यापासून म्हणजेच मागच्या २० वर्षांपासून आमचा फारसा संपर्क नाही. लग्नानंतर ती भिवाडी या ठिकाणी पतीसह राहते आहे. तर मी मध्य प्रदेशातल्या गावात वास्तव्य करतो. एवढंच नाही तर अंजूचं मानसिक आरोग्य फारसं ताळ्यावर नसतं आणि ती विक्षिप्त आहे.”

माझा जावई अरविंद हा एकदम साधा माणूस आहे. अंजू मात्र विक्षिप्त आहे. तिचं तिच्या मित्राशी अफेअर वगैरे असेल असंही मला वाटत नाही. ती फक्त विक्षिप्तपणातून किंवा डोक्यात एक सणक आली म्हणून त्याला भेटायला गेली असेल एवढं मी खात्रीने सांगू शकतो असंही थॉमस यांनी सांगितलं आहे. मी तिच्या विक्षिप्त स्वभावामुळेच तिच्याशी फारसा संपर्कात नसतो असंही अंजूच्या वडिलांनी सांगितलं.

हे पण वाचा- “अंजू विक्षिप्त आणि मानसिकदृष्ट्या….”, पाकिस्तानात गेलेल्या भारतीय महिलेच्या वडिलांचं वक्तव्य

काय आहे हे प्रकरण?

अंजू नावाची एक भारतीय महिला पाकिस्तानात पोहचली आहे. आपण आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानात आल्याचं तिने म्हटलं आहे. प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण ताजं असतानाच ही नवी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिवडीमधली विवाहिता अंजू ही थेत पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रियकराला भेटण्यासाठी गेली आहे. तिच्या पतीला आणि मुलांना सोडून तिने पाकिस्तान गाठलं. ज्यानंतर तिच्या पतीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know what seema haider said about anju nikaah in pakistan scj