Entrepreneur Couple : छोटा व्यवसाय करणाऱ्या एका दाम्पत्याने बंगळुरुमध्ये दोन वर्षे घालवली. त्यानंतर त्यांनी हे शहर सोडायचं ठरवलं. इथले लोक, इथलं वातावरण खूपच चांगलं आहे तरीही आम्ही हा निर्णय घेतला असं अश्विन आणि अपर्णा या दोघांनीही म्हटलं आहे. या जोडप्याची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आम्हाला वाटतंय की बंगळुरु हळूहळू आम्हाला मारतं आहे असं म्हणत या दोघांनीही हे शहर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांची शहराबाबतची पोस्ट व्हायरल झाली आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

काय आहे अश्विन आणि अपर्णाची इन्स्टाग्राम पोस्ट?

बंगळुरु आम्हाला हळूहळू मारतं आहे..अश्विन आणि अपर्णा हे दोघंही कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करतात. तसंच त्यांनी स्वतःचा व्यवसायही सुरु केला आहे. मागच्या दोन वर्षांपासून बंगळुरुत ते राहात होते. मात्र आता या जोडप्याने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात कदाचित हे वाचून आमचा तिरस्कार कराल. पण बंगळुरु आम्हाला हळूहळू मारतंय असं आम्हाला वाटतं आहे. त्यामुळे आता आम्ही भारताची सिलिकॉन व्हॅली समजलं जाणारं हे शहर सोडतो आहोत असं या जोडप्याने म्हटलं आहे. आम्ही राहायला सुरुवात केली तेव्हा इथले लोक खूप चांगले आहेत, वातावरणही खूप चांगलं आहे हे आम्हाला लक्षात आलं. पण एक काळ लोटल्यानंतर वातावरणात बदल होऊ लागले. आम्ही इथे सारखे आजारी पडू लागलो. अपर्णा यांनी म्हटलं आहे की इथे राहू लागल्यानंतर मला आता श्वास घेण्यासंबंधीचा त्रास उद्भवला आहे. तसंच अश्विनचं म्हणणं आहे की मला सर्दी आणि खोकला होणं हा त्रास सारखा होऊ लागला आहे, असं या दोघांनी म्हटलं आहे. यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.

जोडप्याने आहारातही बदल केला पण…

या जोडप्याने पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांनी अगदी त्यांच्या आहारातही बदल करुन पाहिला. मात्र श्वास घेण्यासाठीचा त्रास आणि इतर आजार यांचं प्रमाण वाढलं. बंगळुरुतली हवा ही या सगळ्याचं मूळ आहे हे त्यांना समजलं त्यामुळे त्यांनी बंगळुरु सोडायचा निर्णय घेतला.

आम्हाला वाटतंय की बंगळुरु हळूहळू आम्हाला मारतंय. इथली हवा रोगट आहे, मला श्वसन विकार झाले आहेत तर अश्विनला सर्दी खोकल्याचा त्रास सारखा सारखा उद्भवतोय. त्यामुळे आम्ही बंगळुरु सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अपर्णा आणि अश्विन,बंगळुरुतले व्यावसायिक

बंगळुरुच्या हवेबाबत काय म्हणते आहे अपर्णा?

बंगळुरुचे लोक म्हणतात इथली हवा छान आहे. पण हे वास्तव आहे का? नक्कीच नाही. असं अपर्णा तिच्या व्हिडीओत म्हणते आहे. बंगळुरुची हवा घातक आणि अतिशय रोगट आहे असं फेब्रुवारी महिन्यात आलेला अहवाल सांगतो. त्यामुळे आम्ही आता बंगळुरु सोडण्याचा निर्णय घेतलाय असंही हे दोघं म्हणत आहेत. या दोघांच्या पोस्टवर आता लोक प्रतिक्रिया देत आहेत.

लोकांच्या प्रतिक्रिया काय?

या दोघांनी बंगळुरु सोडतोय म्हणत केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोक म्हणत आहेत तातडीने बंगळुरु सोडा. अनेक लोक इथे कामासाठी येतात आणि गर्दी करतात. इतर लोकांसाठी हे शहर जरा रिकामं करा. तुम्हाला वाटतंय की इथली हवा वाईट आणि रोगट आहे तर तातडीने इथून निघून जा. अशा विविध कमेंट त्यांच्या या व्हिडीओवर येत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entrepreneur couple said bangalore is slowly killing us what internet users answers to them scj