ICICI Bank Minimum Balance Rule: खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने १ ऑगस्ट २०२५ पासून बचत खात्यांसाठी मासिक सरासरी शिल्लक रकमेची आवश्यकता झपाट्याने वाढवली आहे. सुधारित नियमांनुसार आता महानगर आणि शहरी भागातील ज्या शाखा आहेत, तिथल्या खातेधारकांना मासिक सरासरी शिल्लक रक्कम ५०,००० रुपये (पूर्वी १०,०००) एवढी ठेवावी लागेल. बँकेच्या या निर्णयानंतर आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. जनतेच्या पैशांची ही लूट असल्याचे अनेकजण बोलत आहेत.
फक्त महानगर किंवा मोठी शहरेच नाही तर इतर भागांसाठीही हे बदल करण्यात आले आहेत. निमशहरी भागासाठी किमान शिल्लक २५,००० रुपये (पूर्वी ५०००) आणि ग्रामीण भागातील खातेधारकांसाठी ही रक्कम १०,००० (पूर्वी २,५००) रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
नवीन नियम कुणाला लागू?
१ ऑगस्ट २०२५ नंतर खाते उघडलेल्या खातेधारकांनाच हे नवे नियम लागू होणार आहेत. जुन्या ग्राहकांना नवे निकष लागू होणार नाहीत. नवे खातेधारक जर किमान सरासरी रक्कम खात्यात ठेवू शकले नाहीत तर त्यांच्याकडून दंडही आकारण्यात येणार आहे. आवश्यक किमान मासिक सरासरी शिल्लक राखण्यात अयशस्वी होणाऱ्या ग्राहकांना कमी रकमेच्या ६ टक्के किंवा ५००, यापैकी जे कमी असेल ते आकारले जाईल.
या नव्या नियमांमुळे आता आयसीआयसीआय बँक सर्वात महागड्या खासगी बँकांपैकी एक झाली आहे. दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांनी किमान शिल्लक रकमेचा दंड रद्द केला आहे. दुसरीकडे एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेत शहरी भागातील ग्राहकांसाठी खात्यात किमान शिल्लक रक्कम १०,००० रुपये ठेवण्याचा नियम आहे.
सोशल मीडियावर लोक काय म्हणाले..
आयसीआयसीआय बँकेने केलेली वाढ ही भेदभाव दर्शविणारी आहे, अशी टीका अनेकांनी केली आहे. तर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आरबीआयला आवाहन करत या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. हे नवे निकष मध्यम आणि कनिष्ठ उत्पन्न गटातील खातेधारकांसाठी अडचणीचे ठरू शकतात, असेही काही जणांचे म्हणणे आहे.
बँकेने मासिक शिल्लक रकमेसाठी जे निकष ठेवले आहेत, ते भारतातील कर्मचाऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षाही अधिक आहेत, असे काहींचे म्हणणे आहे. तर काही वापरकर्त्यांनी बँकेवर श्रीमंत खातेधारकांना प्राधान्य दिल्याचा आरोप करत खाते बंद करण्याची धमकी दिली आहे.
एका वापरकर्त्याने लिहिले, “भारतात २३ कोटी लोक दारिद्ररेषेखाली जीवन जगत आहेत आणि आयसीआयसीआय बँक खात्यात महिन्याला सरासरी ५० हजारांची शिल्लक ठेवायला सांगत आहे. मास्टरस्ट्रोकच आहे हा!”
आणखी एका वापरकर्त्याने लिहिले, “भारतातील खासगी बँक क्षेत्रातील ही सर्वात आघाडीची बँक आहे. पण मला वाटते, आता तिचा वाईट काळ सुरू झाला आहे. ही ग्राहकांची एकप्रकारे फसवणूक आहे. एकीकडे सरकारी बँकामध्ये किमान शिल्लक न ठेवल्याबद्दलचा दंड रद्द केला आहे. तर दुसऱ्या बाजूला खासगी बँका रक्कम आणि दंड वाढवत आहेत. हाच खासगीकरणाचा तोटा आहे.”