राजकारणात प्रत्येक शब्द जपून वापरावा, हे राजकारणी लोकांना माहिती असते. कारण विरोधक कधी अर्थाचा अनर्थ करतील याचा नेम नाही किंवा तुमचेच शब्द तुमच्यावर कसे उलटवतील हेही सांगता येत नाही. आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास सोबतही असंच पाहायला मिळत आहे, ते सध्या पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, अशा चर्चा रंगताहेत. तेव्हा त्यांनी तीन वर्षांपूर्वी केलेले एक ट्विट शाझिया इल्मी यांनी शोधून काढून त्यांच्यावरच पलटवार केला.
२०१४ मध्ये मे महिन्यातच अंतर्गत वादाला कंटाळून शाझिया यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा कुमार विश्वास यांनी एक ट्विट केले होते. ‘धीरज, धरम, मित्र अरु नारी आपद काल परखिए चारी’. धैर्य, धर्म, मित्र आणि एका महिलेची परीक्षा संकटकाळी होते असे त्यांना सांगायचे होतं. शाझिया यांनी राजीनामा देताना ट्विट करत कुमार विश्वास यांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. आता हेच ट्विट शाझिया यांनी शोधून काढले आहे आणि कुमार विश्वास यांच्यावर पलटवार केला आहे. आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी कुमार विश्वास हे संघ आणि भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला होता. तेव्हा ‘अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि कुमार विश्वास या तीन व्यक्तींनी आम आदमी पक्षाची स्थापना करत एका चळवळीची सुरुवात केली. मात्र अमानतुल्ला खान यांच्या आरोपांमुळे माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले,’ असे ट्विट करत विश्वास यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. त्यातूनच नाराज झालेले कुमार विश्वास पक्ष सोडण्याचा तयारीत आहे, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. तेव्हा कुमार विश्वास यांची नाराजी दूर करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांची भेट घेतली.