डेहराडूनमधील गढी कॅन्टाँन्मेट येथे लष्करी अधिकाऱ्याने श्वानांना सळईने मारल्याची घटना नुकतीच घडली आहे. रागाच्या भरात या अधिकाऱ्याने मारलेल्या तीन श्वानांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन श्वान गंभीर जखमी झाले. इतकेच नाही तर या श्वानांना आहे त्याच अवस्थेत ठेऊन हा लष्करी अधिकारी सुटीवर गेल्याने त्याच्यातील निर्दयीपणा समोर आला आहे. या प्रकरणावरुन या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी शहरातील श्वानप्रेमींनी केली आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी गुप्तचर यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या या वरिष्ठ अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. मनिष थापा ११ मे रोजी सायंकाळच्या वेळी फिरायला गेले होते. यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्यांना त्रास दिल्याच्या कारणावरुन हे अधिकारी चिडले. या लेफ्टनंट कर्नलने श्वानांचा सळईने मारले. श्वानांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने काही नागरिक या ठिकाणी जमले आणि श्वानांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र, तीन श्वानांचा आधीच मृत्यू झाला होता. तर इतर २ जण जखमी होते. जखमी श्वानांवर उपचार चालू असल्याचेही सांगण्यात आले आहे. पशु अधिकार कार्यकर्त्यां पुजा बहुखंडी यांना ही बाब समजताच त्या घटनास्थळावर दाखल झाल्या. आणि श्वानांना आपल्यासोबत घेऊन गेल्या. यानंतर त्यांना या अधिकाऱ्याविरोधात एफआयआरही दाखल केली. सोशल मीडियावरही त्यांनी स्वाक्षरी मोहीम राबविली. तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, थापा सुटीसाठी बाहेरगावी गेले असून, त्यांचा फोनही लागत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.