‘डीएफडब्ल्यू दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सावा’त ‘डॉ. रखमाबाईंची’ मजल ‘रुल्स डोन्ट अप्लाय’ या ब्रीद वाक्यातून आपली जीवनी घडवणाऱ्या डॉ. रखमाबाई यांच्यावरील आधारित चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावांत स्थान मिळवण्यात यशस्वी होत आहेत. मानाचा समजला जाणाऱ्या ‘डीएफडब्ल्यू दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सवा’त हा चित्रपट दाखवला जाणार आहे. 'डॉ. रखमाबाई' चित्रपट सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने चित्रपटाचा टीझर डीएफडब्ल्यू दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सवाच्या सोशल मिडीया अकाउंटवरून लाँच करण्यात आला. या टीझरमध्ये अठराशेच्या दशकात स्त्रियांना सोसावे लागणारे अत्याचार, त्यांना वेठीला धरणारी मागासलेली विचारसरणी, डॉ. रखमाबाईंना त्यांच्या बाबांची लाभलेली साथ यात पाहावयास मिळते. तसचे, डॉ. रखमाबाईंची डॉक्टर होण्याची जिद्दही यात आपल्याला दिसते. डॉक्टर रखमाबाईंच्या जिद्दीला सलाम करत डीएफडब्ल्यू दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता 'डॉक्टर रखमाबाई' या चित्रपटाने होणार आहे. चित्रपटानंतर डॉक्टर रखमाबाईंची भूमिका चोख बजावणाऱ्या तनिष्ठा चॅटर्जीशी उपस्थितांना संवादही साधता येणार आहे. डॉक्टर रखमाबाई साकारणं आव्हानात्मक असल्याचं म्हणत ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंद तनिष्ठाने व्यक्त केला. दिग्दर्शक अनंत महादेवन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केली आहे. समाजाविरोधात आपलं स्वत्व जपणाऱ्या डॉक्टर रखमाबाईंची जिद्द आपल्यासमोर आणणारा ‘डॉक्टर रखमाबाई’ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. पिंक या चित्रपटातून तनिष्ठा बॉलीवूडमध्ये झळकली होती. त्यानंतर ती आता मराठी चित्रपटात दिसणार आहे. 'डॉक्टर रखमाबाई' या चित्रपटासाठी तनिष्ठाने मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषांचे धडे गिरवल्याचे तनिष्ठाने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. तनिष्ठा म्हणाली होती की, डॉ. रखमाबाई यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यानंतर मी चकीत झाले होते. त्यांच्याबद्दल ब-याच लोकांना फार कमी माहिती आहे याचे मला दुःख वाटतेय. सराव करणा-या त्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. त्यांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर मी प्रभावित झाले. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते. त्यामुळे हा बालविवाह होता म्हणून त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली होती. त्यांनी दिलेल्या या लढ्यामुळे संमती कायदा १९८१ मध्ये एक मोठा बदल करण्यात आला होता. त्यांच्यामुळेच मुलींच्या वयाची मर्यादा तेव्हा १२ वरून १६ वर्ष इतकी करण्यात आली होती. त्या जवळपास ९१ वर्ष जगल्या आणि वयाच्या नव्वदीपर्यंत रोज रुग्णालयात जात होत्या, असे तनिष्ठाने सांगितले.