मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील विविध संस्थांचा समावेश

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा सुरळीत चालविण्याकरिता पालिका प्रशासनाकडून विशेष कृती दल समितीची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमध्ये शहरातील पोलीस अधिकाऱ्यांसह विविध खासगी संस्थांच्या पधादिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा खासगी संस्थेच्या मदतीने चालवण्यात येते. हे कंत्राट भागीरथी या संस्थेला देण्यात आले होते. मात्र प्रशासन आणि कंत्राटदारामध्ये वाद निर्माण झाल्याने हे कंत्राट रद्द करून महालक्ष्मी या संस्थेला तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले आहे. तसेच नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून नव्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया प्रलंबित आहे.

त्यापूर्वी सुमारे १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात परिवहन सेवा सुरळीत चालवण्याकारिता विविध खासगी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करून कृती दलाची स्थापना करावी अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महानगरपालिकेकडून समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याकरिता वाहतूक विभागातील पोलीस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून इच्छुक खासगी संस्थांना पत्रक काढून आमंत्रण देण्यात आले आहे.

तसेच यामध्ये सार्वजिनक बांधकाम विभागाचे अभियंता, मेट्रोचे अभियंता, टॅक्सीचालक संघातील पदाधिकारी, रिक्षाचालक संघातील पधादिकारी, खासगी सामाजिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील परिवहन सेवा सुरळीत करून त्याकरिता आवश्यक असलेल्या बदलाचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.

या लोकांचा टास्क फोर्समध्ये समावेश

  • वाहतूक पोलीस अधिकारी
  • सार्वजनिक बांधकाम अधिकारी
  • मेट्रो अधिकारी
  • टॅक्सीचालक संघ पदाधिकारी
  • रिक्षाचालक संघ पदाधिकारी
  • खासगी संस्था पदाधिकारी
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Creation action force smooth running of transport ssh