वसई : ‘‘तुम्ही साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत शहराचा सत्यानाश केला आहे. तुम्हाला पालिका कार्यालयात येऊन फटकावेन’’ अशा शब्दांत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वांतत्र्यदिनानिमित्त वसई-विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या हस्ते मंगळवारी मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नागरिकांशी संवाद साधण्याचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यास वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पाणीटंचाई, वाहतूक कोंडीपासून आरोग्याच्या समस्यांबाबतच्या प्रश्नांचा भडीमार केला. या प्रश्नांना आयुक्त उत्तर देत असताना आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पारा चढला. ‘‘काय कमिशनर, तू कशाला आहेस इकडे? साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत शहराचा सत्यानाश केला. स्वत:ला काय राजे समजता काय? तुम्हाला कार्यालयात येऊन फटकावेन’’, अशी दादागिरीची भाषा ठाकूर यांनी वापरली. ‘‘शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. अनियमित पाणीपुरवठय़ाबद्दल महावितरणाला दोष देऊ नका’’, असेही ठाकूर आयुक्तांना म्हणाले.

महिला उपायुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांवरही दादागिरी

पालिका उपायुक्त चारूशिला पंडित या एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उभ्या राहिल्या असता ‘‘ए शहाणपणा करू नकोस. मला पोपटांकडून उत्तरे नको, आयुक्तांकडून उत्तर हवे,’’ असे ठाकूर म्हणाले. वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे हे उत्तर देत असताना, ‘‘तुमचे सर्वेक्षण घाला चुलीत, कसले सर्वेक्षण करतो? तुम्ही डोक्यावर नाचायला लागला आहात. तुमच्या कानाखाली वाजवली पाहिजे,’’ अशी दमदाटी ठाकूर यांनी केली. ‘‘तुम्ही फक्त वसुली करत असता. वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करेन’’, असे ठाकूर एका उपायुक्ताला म्हणाले. उत्तर देण्यासाठी उभे राहणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला खडसावून आमदार ठाकूर हे त्यांना अपमानित करीत होते.

अधिकाऱ्यांचे मौन

ठाकूर यांच्या दमदाटीबाबत आयुक्तांसह कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. सर्वानी मौन बाळगणेच पसंत केले. मात्र, ठाकूर यांच्या दमदाटीची चित्रफित सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

अधिकाऱ्यांना शिवराळ भाषेत दमदाटी करणे योग्य नाही. ठाकूर यांची ही जुनीच पद्धत आहे. अधिकाऱ्यांनी काम न केल्यास त्यांना जाब विचारायला हवा. मात्र, असे वर्तन अपेक्षित नाही.- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

पाणीटंचाईसह अनेक समस्यांनी लोक त्रस्त आहेत. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन नागरिकांची बोळवण करतात. आधी आमची सत्ता असताना शहरात नियमित पाणी येत होते. आता प्रशासक असताना ५-६ दिवस पाणी येत नाही. त्यामुळे मी माझी भूमिका मांडली. अधिकाऱ्यांनी काम करावे, हा त्यामागचा उद्देश होता.- हितेंद्र ठाकूर, आमदार, वसई

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hitendra thakur warning to vasai municipal commissioner amy