वसई: वसई विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा खदाणीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. वसई पूर्वेच्या नवजीवन येथे दोन मुलांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी तीन च्या सुमारास ही घटना घडली.नसीम रियाजअहमद चौधरी (१३), सोपान सुनिल चव्हाण (१४) अशी या मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई पूर्वेच्या नवजीवन परिसरातील खदाणी आहेत. पावसाळा असल्याने या खदाणी पाण्याने भरून गेल्या आहे. गुरुवारी दुपारी गांगडीपाडा येथे राहणाऱ्या चार ते पाच जणांचा ग्रुप अंघोळीसाठी खदाणीत गेले होते. अंघोळ करताना नसीम आणि सोपान या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने खदाणीत बुडाले. याची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना मिळताच मुलांना बाहेर काढून त्यांना रेंज नाका येथील प्लॅटिनियम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. नाका तोंडात पाणी गेल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून नदी, तलाव, खदाणी, धबधबे अशा ठिकाणी  बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा : वसई: भरावासाठी मातीऐवजी राडारोडा; भूमाफियांकडून महसूल परवान्याला बगल

यापूर्वीच्या घटना

  • विरारच्या जीवदानी परिसरात खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या कल्पेश राठोड (२५) याचा मृत्यू झाला होता.
  • १५ जुलै २०२४ ला नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या अंशु संजय बिडलान (१२) व आर्यन गोपीनाथ यादव (११) या दोन मुलांचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला होता.
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai two children drowned in a quarry at navjeevan area css