वसई: वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात वृक्ष छाटणी करण्याची कामे सुरू आहेत. मात्र छाटणीनंतर निघणाऱ्या फांद्या व अन्य पाळा पाचोळा हा कचरा जागच्या जागीच ठेवून दिला जात असल्याने शहरात बकालीकरण वाढू लागले आहे.वसई विरार शहरात पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी वृक्ष छाटणी करण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे झाडांच्या फांद्या व पाळा पाचोळा याचा कचरा निघत आहे. हा हिरवा कचरा वेळीच उचलला जात नसल्याने जागच्या जागी पडून त्याचे ढिगारे तयार होऊ लागले आहेत. तर दुसरीकडे काही ठिकाणी वाडी मध्ये स्वच्छता व वृक्ष छाटणी केली जात आहे. त्यामुळे सुद्धा विविध ठिकाणच्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाळा पाचोळा व टाकाऊ कचरा टाकून दिला जात आहे. तर काही ठिकाणी घरातून निघणारा टाकाऊ कचरा ही रस्त्याच्या कडेला टाकून दिला जात आहे.
विशेषतः वसंत नगरी, प्रगती नगर रस्ता, नायगाव, वसई पश्चिमेतील रस्ते, एव्हरशाईन, माणिकपूर, उमेळमान, पांचाळ नगर, विरार अशा विविध ठिकाणी या कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात कचरा पडून असल्याने शहराचे बकालीकरण वाढू लागले आहे. याशिवाय हा कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा साचून राहिलेला कचरा पालिकेच्या स्वच्छता विभागाने उचलणे आवश्यक होते. मात्र त्याकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राज दसोनी यांनी केला आहे. दैनंदिन स्वच्छता दररोज होते मग हा कचरा का उचलला जात नाही असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.
कचऱ्याचे ढीग ठेवण्यात आल्याने फुटपाथ व रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या नागरिकांना ही अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. पालिकेने रस्त्याच्या कडेला पडून असलेले कचऱ्याचे ढीग तातडीने उचलून रस्त्याची स्वच्छता करावी अशी नागरिकांमधून करण्यात येत आहे. वृक्ष छाटणी साठी ज्यांना ठेका दिला आहे त्यांनीच ते कचरा उचलण्याची जबाबदारी दिली आहे. याशिवाय पालिकेचा जो दैनंदिन कचरा रस्त्यावर असेल तर तो पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून उचलण्यात येईल तशा सूचना ही संबंधित कर्मचाऱ्यांना केल्या जातील असे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
वसई विरार भागात कचरा रस्त्यावर पडून असल्याने तो कुजून त्यातून दुर्गंधी ही बाहेर पडण्याची शक्यता आहे. आता त्याच कचऱ्यावर आजूबाजूच्या भागातील नागरिक अन्य दैनंदिन कचरा आणून टाकत असल्याने ही समस्या अधिक वाढण्याची शक्यता आहे असे नागरिकांनी सांगितले.
हिरव्या कचऱ्याचा विल्हेवाट रखडली
शहरात दिवसेंदिवस या हिरव्या कचऱ्याचे प्रमाण ही वाढू लागले आहे. वसई विरार शहरातून दररोज साधारणपणे १० ते १२ टन इतका हिरवा कचरा निघत आहे. पावसाळ्यात या कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या कचऱ्याचीविल्हेवाट लावता यावी यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाकडून प्रकल्प राबविण्यात येणार होता. जेणेकरून या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा भुसा किंवा ब्रिकेट तयार करुन विल्हेवाट लावली जाणार होती. यासाठी निधीची तरतूद केली जाणार होती. मात्र पुढील कोणतीही प्रक्रिया न झाल्याने विल्हेवाट रखडली आहे.