वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रदूषण पसरवणाऱ्या १७ सिमेंट कारखान्यांना प्रदूषण नियंत्रक मंडळाने एक आठवडय़ाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी अचानक या कंपन्यांना भेटी दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या कंपन्यांकडून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असून सिमेंटनिर्मितीत उडणाऱ्या धुरळय़ामुळे हवा प्रदूषित होत असून महामार्गावरील वनराईही धोक्यात आली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठय़ा प्रमाणावर सिमेंट तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये दररोज अवजड वाहने, मिक्सर तसेच वाळूची वाहने ये-जा करत असतात. मात्र या कंपन्या कुठल्याही प्रकारचे पर्यावरणाचे नियम पाळत नसल्याने तसेच प्रदूषण रोखण्याची कोणतीच यंत्रणा नसल्याने या कंपन्यांमधून सतत धूळ, मातीचे प्रदूषण होत असते. मातीचे प्रमाण एवढे भयंकर असते की महामार्ग धुळीने भरलेला दिसतो. या धुळीमुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालक तसेच परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.

कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी बुधवारी अचानक भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी कंपन्यांमधून कसलेही नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले. प्लांट (आरएमसी) परिसरात नियमित पाण्याची फवारणी करणे आवश्यक आहे; परंतु तीदेखील केली जात नव्हती. या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियमाक मंडळांच्या अधिकाऱ्यांची सारवासारव करताना तारांबळ उडाली होती. आजवर कारवाई का केली नाही? या भागात सातत्याने प्रदूषणाच्या तक्रारी येत असताना लक्ष का दिले नाही? या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही.

प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना खासदार गावित यांनी धारेवर धरले होते. या सर्व प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश खासदार गावित यांनी दिले. त्या वेळी सर्व १७ कंपन्यांना एक आठवडय़ाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती प्रदूषण नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महामार्गावरील सिमेंटच्या कंपन्यांमुळे मोठे प्रदूषण होत असून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या कंपन्यांची पाहणी केली असता प्रदूषणाच्या कुठल्याच नियमांचे पालन होत असलेले दिसले नाही. आठवडय़ाभरात सुधारणा झाली नाही तर कंपन्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.  – राजेंद्र गावित, खासदार

आम्ही नियमित तपासणी करतो. तशा नोटिसाही बजावल्या आहेत. ज्या कंपन्या प्रदूषणाच्या नियमांचे पालन करत नाही अशा १७ कंपन्यांना एक आठवडय़ाची कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.  -सतीश पडवळ, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, ठाणे- पालघर

नैसर्गिक नाला बुजवला

खासदार गावित यांनी मालजीपाडा येथील एका सिमेंट प्लांट कंपनीला भेट दिली असता या कंपनीलगतचा नाला बुजवला असल्याचे आढळून आले. कंपनीने माती आणि कचरा टाकून नाला बुजवला होता. यामुळे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला असून पावसाळय़ात महामार्गावर पाणी साचण्याची समस्या निर्माण होत आहे. या कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही खासदार गावित यांनी प्रदूषण नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.

महामार्गालगतची वनराई धोक्यात

मुंबईवरून गुजरातला जाणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वसई आणि पालघर जिल्ह्यातून जातो. या महामार्गालगतच दोन्ही बाजूंनी हिरवीगार वनराई आहे. त्यामुळे परिसर निसर्गरम्य दिसतो आणि पर्यावरणाचा समतोलही राखला जातो; परंतु या प्लांटमुळे या हिरव्या वनसंपदेवर गदा आली आहे. या महामार्गालगतची सर्व हिरवी झाडे ही धुरकट झालेली आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution board issue notice to 17 cement companies in mumbai ahmedabad highway area over air pollution zws