वसई: वसई भाईंदर दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी रो रो सेवा चालवली जाते. पण, शहरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रो रो सेवाही आता बंद करण्यात आली आहे.
वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या मार्फत ही चालविली जाते. वसई ते भाईंदर मार्गदरम्यान एकूण अवंतिका, सोनिया आणि वैभवी अशा ३ बोटी चालवल्या जातात. ३३ वाहने व १०० प्रवासी अशी या बोटींची किमान क्षमता आहे. यापूर्वी रो रो सेवेच्या असणाऱ्या ९ फेऱ्यांमध्ये वाढ करून जानेवारीपासून या फेऱ्या १५ करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार आणि बाईक घेऊन जाणारे तसेच इतर प्रवासी देखील रो रो सेवेचा वापर करत असतात.
पण, मंगळवार सकाळपासून वसई विरार शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर वाढल्याने समुद्रालाही चांगलेच उधाण आले होते. भरतीच्या उंचचउंच उसळणाऱ्या लाटा थेट जेट्टीपर्यंत येऊन धडकत होत्या. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वादळी वारा ही होता.
सकाळी वसई जेट्टीतुन ८.१५ ची एक फेरी झाल्यानंतर समुद्राची स्थिती लक्षात घेऊन रो रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाईंदरच्या जेट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर ही पाणी साचले होते त्यामुळे तिथेही नागरिकांना पोहचणे कठीण होते त्यामुळे ही रोरो सेवा बंद ठेवावी लागली असे व्यवस्थापना कडून सांगण्यात आले.