वसई: वसई-विरार महापालिकेने नवघर अंबाडी येथील जलतरण तलावाची दुरवस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे.त्यामुळे हे जलतरण तलाव सुरू होण्यास आणखीन विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वसई विरार महानगरपालिकेने जलतरणपटू आणि शहरातील नागरिकांसाठी पोहण्यासाठी नवघर येथे जलतरण तलाव तयार केले आहे. या तरणतलावात पोहण्यासाठी सुमारे एक हजार सदस्यांनी सभासदत्व घेतलेले आहे. या तरणतलावात अनेक नागरीक नियमितपणे पोहायला येत असतात. मात्र तरणतलावाची दुरावस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

या दुरुस्तीच्या कामामुळे सद्यस्थितीत हा तरण तलाव बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे या कामासाठी महापालिकेने १ कोटी ४४ लाख रुपयांच्या निधीचे नियोजन केले असून २७ मार्च २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला. कामाची मुदत ९ महिन्याची आहे. या तरणतलावात शेड उभारणे, तरणतलाव तयार करणे, जलशुद्धीकरण प्रकल्प बसविणे, अंतर्गत दुरुस्ती व सोयीसुविधा अशा कामाचा समावेश आहे.

सद्यस्थितीत कामाची प्रगती पाहता काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.त्यामुळे अजूनही काम पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोहण्यास येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले आहे.या कामावर दैनंदिन देखरेख ठेवून काम व्यवस्थित होत आहे किंवा नाही याची पाहणी करावी. व काम लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आदेश संबंधीत ठेकेदारास द्यावे व जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी मानकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पोहण्यास येणाऱ्या नागरिकांची गैरसोय

या जलतरण तलावाचा विद्यार्थी , महिला व नागरिकांना पोहण्यासाठी फायदा होत असतो , अनेक जलतरण पट्टू तयार होत आहेत. मात्र त्यांना सराव करण्यासाठी गैरसोय होत आहे. काहींना दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. यात वेळ, पैसा आणि श्रमाचा अपव्यय होत आहे.

तरणतलावाच्या कामाचे कार्यादेश दिल्यानंतर काम सुरू करण्यात आले आहे. येत्या चार ते पाच महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल.

प्रदीप पाचंगे, प्रभारी शहरअभियंता महापालिका