वसई : वसई विरार मध्ये विकास कामा दरम्यान वृक्ष तोडीची परवानगी घेतली जाते. मात्र त्यानंतर पुन्हा वृक्षलागवड करण्यासाठी काही विकासक टाळाटाळ करीत असल्याचे समोर येत आहे. अशा प्रकारांना रोखण्यासाठी पालिकेकडून विकासकांना वृक्षनिधी भरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसा ठराव पालिकेने केला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हे पालिकेने पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात आले आहे.

मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. मात्र त्यात वसईचे हरित क्षेत्र कमी होत असल्याने पर्यावरणावर त्याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. सद्यस्थितीत शहरात विविध प्रकारची विकास कामे ही जोमाने सुरू आहेत. अनेकदा विकास कामांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्ष बाधित होत असतात.या बाधित वृक्षांची तोड करण्यासाठी विकासकाला महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. त्यात तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या एकूण वयोमानानुसार झाडांची लागवड करण्याच्या सूचना केल्या विकासकांना केल्या जातात.

मात्र अनेक विकासक परवानगी मिळाल्यानंतर वृक्ष लागवड करण्यास टाळाटाळ करतात. त्याचा परिणाम हा पर्यावरणावर होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत असतात. तर काही विकासक विना परवानाच वृक्षांची कत्तल करीत असतात. सध्या प्रदूषणाचे प्रमाण ही वाढत आहे. त्याचा परिणाम जीवसृष्टिवर होत आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी अधिकाधिक वृक्षाची लागवड करणे आवश्यक आहे.वृक्ष लागवडीची संख्या वाढावी व वृक्ष लागवड करण्यास टाळाटाळ करणाऱ्या विकासकांना चाप लावण्यासाठी आता पालिकेकडून विकासकांना वृक्षनिधी भरणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसा ठराव ही महापालिकेने केला असल्याचे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.

विकास कामात बाधित होणारी वृक्ष व नवीन लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षाचा निधी आधीच पालिकेकडे जमा करावा लागणार आहे. तेव्हाच विकासकांना परवानग्या दिल्या जातील. तसे न केल्यास विकासकांने निधीची २५ टक्के रक्कम अनामत म्हणून भरावी. झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन केल्यास सात वर्षांनंतर ती पुन्हा परत केली जाईल मात्र तसे न झाल्यास ती अनामत रक्कम जप्त केली जाईल असेही आयुक्त पवार यांनी सांगितले आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने व अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावे यासाठी बांधकाम विकासकांना परवानगी देताना आधी वृक्षनिधी भरणे बंधनकारक असेल. तसा ठराव ही पालिकेने केला आहे. तो जमा होणारा निधी वृक्ष लागवड व त्याच्या संगोपनासाठी वापरला जाईल.अनिलकुमार पवार, आयुक्त वसई विरार महापालिका

झाडांचे मृत्यू प्रमाण कमी करणार

वसई विरार शहरात दरवर्षी मोठ्या संख्येने वृक्षांची लागवड केली जाते. त्या लागवड केलेल्या वृक्षांचे पालिकेकडून संवर्धन ही केले जाते. मात्र काही अडचणीमुळे वृक्षाची रोपे मरण पावतात. सद्यस्थितीत दहा टक्के इतकी वृक्ष मरण पावत असतात. त्यांचे प्रमाण कमी करून ते दोन ते तीन टक्क्यांवर आणण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे. विशेषतः संवर्धनासाठी लागणारी माती, खत, पाणी यासह इतर आवश्यक बाबी त्या वृक्ष रोपाला पुरवून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे.

यंत्रणा अपुरी

वसई विरार शहरात वृक्ष प्राधिकरण विभागात अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे सर्वच विभागात लक्ष देणे कठीण होत आहे.
विशेषतः विकासक परवानग्या घेतात तेव्हा त्याची खरोखरच लागवड करतात की नाही याची पाहणी करण्यासही यंत्रणा अपुरी आहे.त्यामुळे प्रत्येक ठिकाणे जाऊन तपासणी करणे शक्य होत नाही.

बेकायदेशीर वृक्ष तोडीला आळा घाला

वसई विरार शहरात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच वृक्ष तोडीचे प्रकार घडतात. अशा प्रकारांना ही आळा घालण्यात यावा अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. याशिवाय पालिका वृक्षारोपण करते परंतु त्याची संवर्धनाकडे दुर्लक्ष होते असेही नागरिकांनी सांगितले आहे.