वसई : कचरा भूमीवर पडून असलेल्या १५ लाख मॅट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. तीन महिन्यात पालिकेने सुमारे ४० हजार मॅट्रिक टन इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे. वसई विरार शहरात दिवसेंदिवस निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे. दिवसाला साधारणपणे ७५० ते ८०० मॅट्रिक टन इतका कचरा निघतो. हा कचरा वसई पूर्वेच्या गोखीवरे भोयदापाडा येथील कचराभूमीवर टाकला जात आहे. मागील १४ वर्षांपासून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणताच प्रकल्प नसल्याने एका एका वर एक कचऱ्याचे ढिगारे केल्याने डोंगर तयार झाले होते. या साचलेल्या कचऱ्यामुळे सातत्याने आगी लागण्याचे प्रकार, आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरणे अशा अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यात सुमारे १५ लाख मॅट्रिक टन इतका कचरा पडून होता. भविष्यात ही समस्या अधिक जटिल होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही समस्या सुटावी यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यास सुरुवात केली आहे. मे साई युटिलिटी या संस्थेला वीस वर्षांसाठीचे काम देण्यात आले आहे. कचऱ्यावर ट्रॉमल यंत्रणेद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये सुमारे चाळीस हजार मॅट्रिक टन इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे असे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा…मत्स्य दुष्काळात जेलीफिशचे संकट, पुन्हा मच्छीमारांच्या पदरी निराशा; शासन स्तरावरून मदतीची मागणी

कचराभूमीवर असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे. त्या कामाचा आढावा ही घेतला जात आहे. कचरा अधिक असल्याने साधारणपणे दीड ते दोन वर्षे इतका कालावधी लागणार आहे. – डॉ. चारुशीला पंडित, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन महापालिका

यंत्रणेत वाढ करणार

कचराभूमीवर असलेल्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या स्थितीत ३ ट्रॉमल यंत्र असून त्याद्वारे काम सुरू आहे. आणखी १० ट्रॉमल यंत्र खरेदी केली जातील त्यामुळे प्रक्रिया करण्याचे काम जलद होईल. तर दुसरीकडे कचरा वाहतुकीसाठी २० टिपर आणि १७ कॉम्पॅक्टर अशी वाहनेही खरेदी केली जाणार आहेत.

हेही वाचा…अश्लील बेवसिरिज प्रकरण : आणखी ५ तक्रारदार तरुणी समोर, मुख्य आरोपी अटकेत

घनकचरा व्यवस्थापनावर भर

शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचे क्षेपणभूमीवर व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या व्यवस्थापनासाठी पालिकेने स्वतःच्या मालकीची यंत्र सामुग्री खरेदी केली आहे. क्षेपणभूमीवर टाकण्यात येणाऱ्या विल्हेवाट लावण्यासाठी मटेरियल रिकव्हर फॅसिलिटी, सीएनडीवेस्ट प्रकल्प, ग्रीन वेस्ट तर दुसरीकडे मागील अनेक वर्षांपासून साचून राहिलेला सुमारे १५ लाख मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट अशा प्रकारे घनकचरा व्यवस्थापन केले जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात ३६६ कोटींची तरतूद केली आहे. तर दुसरीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन २ मधून ४६ कोटींचा निधी मिळणार आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipality takes action to process 15 lakh metric tonnes of waste to address growing garbage crisis psg