वसई : वसई विरार शहरात मियावाकी वनांचे जंगल तयार करण्यावर पालिकेने भर दिला आहे. आतापर्यंत पालिकेने शहरातील आठ ठिकाणी ९ हजार ६३१ चौरस मीटर क्षेत्रात सुमारे २८ हजार ८०० इतक्या मियावाकी वनांची लागवड केली आहे. या वनांमुळे पर्यावरण संवर्धनासाठी मोठी मदत होणार आहे. वसई विरार भागाचे नागरीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे शहराच्या विविध ठिकाणच्या भागात असलेला जंगल पट्टा, हिरवळ ही कमी होऊ लागली आहे.यामुळे शहरात प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे. प्रदूषण नियंत्रण करणे व पर्यावरण सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी पालिकेकडून विविध ठिकाणी मियावाकी वृक्षांची लागवड करून मियावाकी जंगल तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

वृक्ष प्राधिकरण विभागाकडून जपानी पद्धतीच्या ‘मियावाकी’ तंत्रज्ञान वापरून वसईतही वृक्ष लागवड केली जात आहे. हा उपक्रम पालिकेने राष्ट्रीय स्वच्छ  हवा कार्यक्रमांतर्गत  (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम) या अंतर्गत घेतला आहे. यासाठी १ कोटी २७ लाख रुपये इतक्या निधीचे नियोजन करण्यात आले असून कौल सिटी गार्डन, पाचूबंदर, गुरुदत्त नगर उद्यान, कॅपिटल मॉल जवळ, आचोळे तलाव गार्डन, बेनापट्टी स्मशानभूमी, वालीव, नालासोपारा पश्चिम अशा आठ ठिकाणी पाचशे ते एक हजार चौरस मीटरचे प्लॉट तयार करून त्याठिकाणी मियावाकी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.आतापर्यंत ९ हजार ६३१ चौरस मीटर क्षेत्रात २८ हजार ८०० मियावाकी वृक्ष लागवड झाली आहे.हळूहळू ही झाडे बहरत असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून सांगण्यात आले आहे. आणखीन मियावाकी वने विकसित करण्यासाठी जागेचा शोध सुरू असून जागा उपलब्ध होताच त्या ठिकाणी या वृक्षांची लागवड केली जाईल असेही महापालिकेने सांगितले आहे.

अशी आहे मियावाकी लागवड पद्धत

अतिशय कमी जागेचा वापर करून जास्तीत जास्त झाडं लावण्याची पद्धत म्हणजे ‘मियावाकी’ यात जमिनीची गुणवत्ता लक्षात घेऊन खते, अन्नद्रव्यं वापरल्याने या पद्धतीनं येणारी झाडं पारंपरिक पद्धतीपेक्षा तीस पट वेगाने वाढून घनदाट जंगल तयार होते.जपानमधील वनस्पतीशास्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी हे तंत्र विकसित केलं असल्यानं या पद्धतीला ‘मियावाकी’ असे संबोधले जाते. या पद्धतीत पाचशे- एक हजार चौरस मीटर क्षेत्रात जास्तीत जास्त झाडांची लागवड होऊ शकते. तसेच ही झाडे लागवड करताना तीन फूट खोल खड्डा खणतात. त्यातील सगळी माती काढून शेणखत, गहू-भाताचा कोंडा, विविध खतं टाकलेली नवी माती भरून झाडांची लागवड केली जाते.