किरणकुमार जोहरे
‘एल निनो’प्रभाव यंदा दिसत असून २०१९ चा मोसमी पाऊस भारतात ओढ देणार, असे भाकीत एका खासगी हवामान संस्थेने नुकतेच केले. ‘एल निनो’ म्हटले की दुष्काळाची चिंता व्यक्त करण्याचा परिपाठ इंग्रजी प्रसारमाध्यमांनी पाळला. परंतु ‘एल निनो’ आणि अवर्षण/ दुष्काळ यांचा भारतीय संदर्भात थेट संबंध जोडता येईल का, याची शहानिशा करणारे टिपण..
‘मॉन्सून’ किंवा भारतीय उपखंडातील मोसमी पाऊस आणि ‘एल निनो’ यांचा संबंध आहे’ या गृहीतकाआधारे आजवर अनेक अंदाज दिले गेले आहेत, दिले जात आहेत. केवळ भारतीय नव्हे तर परदेशी संस्थादेखील एल निनोचा आधार घेऊन मॉन्सून कसा कमी होईल हे सांगत असतात. यंदाही अमेरिकेतील हवामानतज्ज्ञांनी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे भारतात २०१९ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अमेरिकन क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने जाहीर केले की, प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय होईल जो भारतात २०१९ साली दुष्काळदेखील आणू शकेल. ‘स्कायमेट वेदर सव्र्हिसेस प्रा. लि.’ या खासगी हवामान संस्थेचे भारतामधील पावसाचे (मॉन्सून) अंदाज हे बहुतेक वेळा ‘एल निनो’ व ‘ला निना’च्या आधारावरच बेतलेले असतात. यंदादेखील स्कायमेटने भारतात मोसमी पाऊस कमी होईल असा अंदाज व्यक्त केला, त्यास अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी ४ एप्रिलच्या अंकात ठळकपणे प्रसिद्धी दिली आहे. हाही अंदाज ‘एल निनो’वर आधारित आहे. यंदा पाऊस कमी होईल, ही शक्यता गृहीत धरण्यास काहीच हरकत नाही. परंतु ज्या वर्षांत एल निनो प्रभाव नव्हता, तेव्हादेखील भारतात ‘सरासरी’पेक्षा कमीच पाऊस झालेला आहे. त्यामुळे कमी पावसाची शक्यता आणि ‘एल निनो’वर भर देणारे अंदाज यांतील फरक सर्वच संबंधितांनी ओळखायला हवा.
‘एल निनो’चा बागुलबुवा दाखविणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारे अशास्त्रीय असलेल्या हवामान अंदाजांमागे आर्थिक बाजूही असते, असे मानण्यास वाव आहे. ‘नोमुरा’ या जपानमधील ब्रोकरेज कंपनीच्या एका अहवालाने दोन वर्षांपूवी, २०१७ मध्ये ‘एल निनो’च्या सावटाची शंका व्यक्त केली होती, तसेच ‘खाद्य महागाईदरात वृद्धी होऊ शकते’ असेही सांगितले गेले होते. मात्र त्याच वर्षी ‘ऑस्ट्रेलियन ब्यूरो ऑफ मेटेओरॉलॉजी’ माहितीनुसार ‘एल निनो’ परिस्थिती घडण्याची शक्यता साधारणत: ५० टक्के होती. याच प्रकारे, ‘एल निनो’मुळेच पाऊस कमी होईल असा अंदाज व्यक्त करीत अनेक वर्षांपासून भारतीय शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. ‘एल निनो’मुळे जगभर सोयाबीन उत्पादन वाढते. तर मका, तांदूळ, गहू यांचे उत्पादन ४.३ टक्क्यांपर्यंत घसरते’ असे वृत्त बीबीसीने दिले होते. तर ‘एल निनो’मुळेच ऊस, कापूस आणि तेलबियायांचेही उत्पादन घसरते आणि त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होतो, असे ‘बिझनेस टुडे’ने म्हटले होते. कोकोची घाना येथील लागवड, इंडोनेशियाची कॉफी लागवड तर थायलंडची उसाची शेती ‘एल निनो’ने बाधित होते, असे २०१६ मध्ये ‘जपान टाइम्स’ने म्हटले होते. ‘कमॉडिटी मार्केट’चा वाढता व्याप पाहता, यावर विसंबून आर्थिक निर्णय घेणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे.
मुळात ‘एल निनो’चा मोसमी पावसाशी काही संबंध आहे का, हाच खरा मूलभूत प्रश्न आहे. प्रशांत महासागरात पूर्वेला जाणारा पाण्याचा प्रवाह जास्त गरम झाला की बाष्पीभवन जास्त होते. हा ‘एल निनो’ प्रभाव. बाष्पीभवन जास्त झाल्याने पाऊस आधीच समुद्रात कोसळून जातो. पाऊस आधीच कोसळल्यामुळे भारतात मॉन्सून खराब होतो, असे मत नेहमी मांडले जाते. ‘एल निनो’चा प्रभाव संपल्यानंतर हा प्रवाह थंड होतो आणि प्रशांत महासागराचे तापमान घटते. हा ‘ला निना’ प्रभाव. पेरूच्या पश्चिम किनारपट्टीपासून २०० किलोमीटर दूर उत्तरेकडून दक्षिण दिशेला वाहणारा विषुववृत्ताला समांतर होत जाणारा उष्ण पाण्याचा सागरी प्रवाह आहे. त्याचा पहिला अभ्यास सन १९२३ मध्ये सर गिलबर्ट थॉमस वॉल्कर यांनी केला. ‘एल निनो’ हा स्पॅनिश शब्द असून मच्छीमारांनी हे नाव दिले आहे. त्याचा अर्थ ‘ख्रिस्ताचा मुलगा’ असा होतो, तर ‘ला निना’ म्हणजे ‘लहान मुलगी’. ‘एल निनो’चा प्रभाव वाढला असल्याने पेरू, इक्वेडोर या देशांत नऊ महिने किंवा त्याहून अधिक काळ पाऊस कोसळून पूरसंकट येण्याचा धोका; तर इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियात दुष्काळ पडून ठिकठिकाणी आगी लागण्याचा धोका असल्याचे मानले जाते. जेव्हा ‘एल निनो’ भारतात किंवा ऑस्ट्रेलियात दुष्काळ आणि वणव्यांची स्थिती वाढवतो, त्याच वेळी दक्षिण अमेरिकेत पाऊस आणि भरपूर समुद्रजीवांची रेलचेल करतो. तर ‘ला निना’ येते तेव्हा भारतात भरपूर पाऊस आणि दक्षिण अमेरिकेला प्रचंड बोचरी थंडी देतात. हेच वारे पुढे उत्तर अमेरिकेत पोहोचून कॅनडा हा देश बर्फमय करतात, असे मानले जाते.
सन २००२ मध्ये ‘एल निनो’ असताना नर्ऋत्य मोसमी पाऊस १९ टक्क्यांनी कमी झाला आणि शेतकी सकल राष्ट्रीय उत्पन्नात (अॅग्रि. जीडीपी) १८ टक्क्यांनी घट झाली. मग भारतीय शेतकऱ्यांपुढे ‘एल निनो’ हा जणू भीतीदायक राक्षस असेच चित्र रंगविले जाऊ लागले. या शतकात, २००० सालापासून एल निनो २००२, २००४, २००६, २००९ आणि २०१५ साली अवतरला. यापैकी २००६ साली ‘एल निनो’ असतानादेखील चांगला पाऊस झाला. भारतात गेल्या ११३ वर्षांच्या काळात फक्त १३ वर्षे सरासरीपेक्षा जास्त पावसाची ठरली आहेत. गेल्या २० वर्षांत एकाही वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला नाही. एवढेच कशाला, आतापर्यंत जितक्या वेळा ‘एल निनो’ प्रभाव झाला, त्यापैकी निम्म्या वेळा त्याचा भारतीय मोसमी पावसावर काडीचाही प्रभाव दिसून आलेला नाही. उलट १९९७ या वर्षी ‘एल निनो’ सर्वाधिक उष्ण होता आणि भारतात दुष्काळच पडणार अशी भाकिते भारतीय हवामान विभागासह अनेक ठिकाणचे हवामान संशोधक करीत होते; पण १९९७ या वर्षी मॉन्सून चांगला झाला. १९५० ते २००० सालापर्यंत एकूण तेरा वेळा (१९५०, १९६५, १९६६, १९७२, १९७४, १९७९, १९८२, १९८३, १९८६, १९८७, १९९१, १९९२, १९९७) ‘एल निनो’ होता. त्यापैकी केवळ तीन वेळा (१९५१, १९६५, १९७२) दुष्काळ पडला.
असे का झाले, याला कारणे आहेत. वैज्ञानिकांनी ती शोधली आहेत. विषुववृत्तीय- हिंदी महासागरातील आवर्तन (इक्विनो : इक्वेटोरियल इंडियन ओशन ऑसिलेशन) निर्माण झाल्याने ‘सी-सॉ’ परिणाम होऊन आवर्तनाच्या आणि भारताच्या देखील पश्चिमेकडील भागात पाऊस वाढतो; तर आवर्तनाच्या पूर्वेला पाऊस कमी होतो. ‘इक्विनो’ ही स्थिती ‘एल निनो’ असतानादेखील १९९७ आणि २००६ या वर्षी भारतासाठी ‘वरदान’ ठरली; असे शास्त्रीय कारण एस. गाडगीळ या भारतीय संशोधकाने ‘करंट सायन्स’ या संशोधन- नियतकालिकात (वर्ष १०६, अंक १०, पृ. १३३५-१३३६) प्रसिद्ध झालेल्या टिपणात नमूद केले आहे.
तर ‘‘एल निनो’मुळे मॉन्सून संपताना (ऑक्टोबर ते डिसेंबर) दक्षिण भारतात पाऊस वाढतो’ असा निष्कर्ष काढणारा न्यू यॉर्क येथील ‘इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉरक्लायमेट प्रेडिक्शन’ न्यूयॉर्कचे लॅरिफ झुबेर आणि सीएफ रोपेलेवस्की यांचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ क्लायमेट’ या संशोधनपत्रिकेत २००५ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
मॉन्सून या प्रचंड मोठय़ा असलेल्या ‘सिस्टीम’पुढे तुलनेने लहान ‘एल निनो’ किंवा ‘ला निना’ हे खरोखर प्रभाव पडतात का, ही रास्त शंका उपस्थित होते आणि तिच्यात तथ्य आहे. उष्ण आणि थंड असे किमान एक हजारापेक्षा जास्त सागरी प्रवाह पृथ्वीवर आहेत. त्या सर्वाचा विचार सोडून केवळ ‘एल निनो’ किंवा ‘ला निना’सारख्या प्रभावांना महत्त्व देणे योग्य ठरणार नाही. ‘एल निनो’ची (किंवा ला निनाची) तीव्रता, सागरी प्रवाहाच्या तापमानातील फरक व मॉन्सूनचे बळ यांचा आलेख समजून घेतल्यास त्याचा काही एक संबंध नाही हे सत्य कळते. ‘एल निनो’ आणि भारतीय मॉन्सूनचे पर्जन्यमान किंवा दुष्काळ यांच्यातला परस्परसंबंध ‘एकास-एक’ असा तर मुळीच नाही.
अर्थात, केवळ एक टक्का जरी पाऊस कमी झाला तरी सकल राष्ट्रीय उत्पन्न ०.३५ टक्क्यांनी कमी होते. आणि भारतीय शेती ही प्रामुख्याने मॉन्सूनवरच अवलंबून असल्याने शेतकऱ्यालाच फटका अधिक बसतो, हे लक्षात ठेवून दुष्काळ, अवर्षण यांना तोंड देण्याची तयारी केलीच पाहिजे. प्रस्तुत लेखाचा हेतू कोणतेही भाकीत वर्तविण्याचा नसून ‘एल निनो’चा बागुलबुवा व्यर्थ आहे, हे सांगणे एवढाच आहे.
लेखक भौतिकशास्त्रज्ञ व हवामानाचे अभ्यासक आहेत. kkjohare@hotmail.com