मागील शैक्षणिक वर्षांत नवीन प्रवेश घेण्याची परवानगी नसतानाही आदित्य आयुर्वेद महाविद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. मात्र, आता या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नकार दिला आहे. तब्बल ४० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थाचालक व प्राचार्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एआयएसएफ संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
येथील आदित्य शिक्षण संस्थेची महाविद्यालये दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणाने वादग्रस्त ठरत आली आहेत. या पूर्वी संस्थेच्या दंत वैद्यकीय महाविद्यालयात मान्यता नसताना प्रवेश देण्याचे प्रकरण घडले होते. याच संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही मान्यता नसताना प्रवेश दिल्याने अनेक विद्यार्थ्यांना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागले होते. आता याच संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयात पुरेशा सुविधा व अध्यापक वर्ग उपलब्ध नसल्याने या महाविद्यालयाला नवीन प्रवेश घेण्यास विद्यापीठाने बंदी घातली होती. या महाविद्यालयाची संलग्नता रद्द करण्यात आल्याचेही विद्यापीठाने कळवले होते. मात्र, असे असतानाही महाविद्यालयात व्यवस्थापनाने बीएएमएसच्या अभ्यासक्रमासाठी मोठय़ा प्रमाणावर शुल्क महाविद्यालयाने घेतले असले, तरी संबंधित विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना परीक्षा अर्ज भरू देण्यास मात्र महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आता लाखो रुपये खर्च करूनही या विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी संस्थाचालक व प्राचार्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी एआयएसएफ संघटनेच्या फिडेल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्यमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 student of aditya ayurvedic college future under dark