आयआरबी कंपनीने सुरू केलेल्या टोल आकारणी प्रश्नी रविवारी टोलविरोधी कृती समितीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानावर प्रचंड मोर्चा काढून टोलविरोधातील संतप्त भावनांचे दर्शन घडविले. मोर्चाचे स्वागत करून मुश्रीफ यांनी मंगळवारी (२२ ऑक्टोबर) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बठक घेण्याचे आश्वासन दिले. काल टोलची पावती भरणारे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे मोर्चातील वक्त्यांचे टीकेचे लक्ष्य ठरले. ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील व अॅड. गोिवद पानसरे यांनी मंत्री पाटील हे सूर्याजी पिसाळ असून यापुढे त्यांचा ‘पिसाळ मंत्री’ म्हणून नामोल्लेख करावा, अशी टीका केली.
आयआरबी कंपनीने सलग तिस-या दिवशी कोल्हापूर शहरात टोल आकारणी सुरू केली आहे. तर कृती समितीने टोलविरोधातील लढा तीव्र करण्याचा संकल्प केला आहे. या अंतर्गत रविवारी कृती समितीने कामगारमंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. या मोर्चात शहर व ग्रामीण भागातील कार्यकत्रे, नागरिक यांची संख्या लक्षणीय होती. टोलविरोधात घोषणाबाजी करीत कागलमधील ऐतिहासिक गबी चौकात मोर्चा दाखल झाला. मोर्चाचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्याची कल्पकता दाखवून मुश्रीफ यांनी कृती समितीच्या लढय़ाला वेगळ्या प्रकारे साथ दर्शविली.
या वेळी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, अॅड. गोविंद पानसरे, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी टोल आकारणी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करुन कोल्हापूरच्या जनतेची भावना मुश्रीफ यांनी मंत्रिमंडळात मांडावी असे आवाहन केले. त्यावर मुश्रीफ यांनी टोलप्रश्नी मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समवेत बठक घेण्याचे आश्वासन दिले. तीस वर्षांची टोल आकारणी अन्यायकारक असल्याचे मतही त्यांनी मांडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti toll action committees march in front of the residence of mushrif