स्वातंत्र्यसेनानी आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा पुतळा औरंगाबाद शहरात उभारण्याच्या बीरसा मुंडा जन्मोत्सव समितीच्या मागणीला माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी पाठिंबा दिला.
आदिवासी नेते बिरसा मुंडा यांनी ब्रिटि़शांच्या अत्याचाराविरोधात ईशान्य भारतातील आदिवासींना संघटित केले. ब्रिटिश सरकार आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करीत असताना बिरसा मुंडा यांनी जल, जमीन, जंगल यावर आमचा जन्मजात अधिकार आहे, असे ठणकावून त्यासाठी आदिवासींना एकत्र करून संघटित शक्ती उभारली व ईशान्य भारतात मुंडाराज स्थापन केले. बिरसा मुंडा यांना ब्रिटिशांनी तुरुंगात डांबले व तेथेच विषबाधा करून त्यांची हत्या केली. अशा या लढवय्या आदिवासी नेत्याचा औरंगाबादमध्ये पुतळा असावा, अशी मागणी बिरसा मुंडा जन्मोत्सव समितीने बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली. या वेळी पवार यांनी या मागणीला पाठिंबा दिला.
समितीचे अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर, प्रा. मोतीराज राठोड, अर्चन्त मुंदडा, प्र. ज. निकमगुरूजी, तोताराम जाधव, नंदलाल राजपूत, प्रमोद ढाले, अॅड. के. डी. शिंदे, मोहम्मद नवाज आदींची भाषणे झाली. शाहीर लक्ष्मण मोकासरे यांनी या वेळी पोवाडा सादर केला. रतन पाटील व ज्योती जाधव यांनी स्वागत केले. अनिस पटेल यांनी सूत्रसंचालन केले. बी. डी. सूर्यवंशी यांनी आभार मानले. अनिसखाँ युनिसखाँ पठाण, अनिल घोडके, गोरख मोरे, पुष्पा नेघी, किशोरभाऊ चव्हाण, अविनाश अंभोरे, गंगाधर थोरात आदी उपस्थित होते.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birsa mundas ideal should be there in aurangabad pawar