सलमान खानच्या लग्नाची चर्चा कदाचित तो हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यापासूनच सुरू आहे. सुरुवातीला संगीता बिजलानी, त्यानंतर ऐश्वर्या राय आणि आता कतरिना कैफ यांच्याबरोबर त्याची जोडी जमली आणि अर्थातच सगळीच प्रकरणे फिस्कटली. आता तर सलमानने आपल्याला लग्नच करायचे नाही, असा पवित्रा घेतला आहे. लग्न हा विषय काढला तरी सल्लुमियाँचा पापड मोडतो. मात्र आता सलमानच्या लग्नाचे प्रकरण थेट ‘कोर्टा’त गेले आहे. सलमानने लग्न करू नये, असा युक्तिवाद अ‍ॅड. अर्शद वारसी यांनी केला, तर त्याच्या विरुद्ध बाजू मांडली अ‍ॅड. बोमन इराणी यांनी! निमित्त होते ‘जॉली एलएलबी’ या
चित्रपटाच्या प्रसिद्धीचे. अर्शद आणि बोमन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी हे दोघेही एका पुरस्कार सोहळ्यात पोहोचले. तेथे त्यांनी आपल्या हातात खटला घेतला तो सलमानच्या लग्नाचा. विशेष म्हणजे या खटल्यासाठी न्यायाधीश म्हणून खुद्द सलमाननेच कामकाज पाहिले. लग्न कसे वाईट आहे, सलमानने लग्न केल्याने त्याचे कसे नुकसान होईल, वगैरे बाजू अर्शदने सलमानपुढे मांडली. त्याचा प्रतिवाद करताना बोमनने सलमानला लग्न का करत नाहीस, काय प्रॉब्लेम आहे, लग्न केल्याने काय फायदे होतील, वगैरे अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले.
पत्रकारांनी लग्नाचा विषय काढल्यानंतर चिडणाऱ्या सलमानने या खटल्याची मात्र मजा लुटली. अर्शद आणि बोमनच्या प्रश्नांनाही त्याने तेवढीच मजेशीर उत्तरे दिली. हा खटला सलमानसह प्रेक्षकांनाही आवडल्याचे बोमनने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage subject of salman in the court of boman and arshad