‘इतने चेहरों मे अपने चेहरे का निशान.. पेहचान..रामूच्याच रंगीला चित्रपटातील गाण्याच्या या ओळी. लाखो चेहऱ्यांमध्ये आपली एक वेगळी ओळख असावी, ही इच्छा अनेकांना चित्रपटांच्या मायाजालात घेऊन येते. चित्रपट मग ते हिंदी असोत, मराठी असोत नाहीतर जगाच्या पाठीवर कुठेही घडणारा असो..‘स्ट्रगल’ हा या उद्योगाचा अविभाज्य भाग आहे. आणि इथे स्ट्रगल फक्त पडद्यावरच्या कलाकारांना करावे लागते असे नाही तर पडद्यामागे वावरणारे सगळे चेहरेही या स्ट्रगलमधूनच कधी वर येतात. कधी गुमनाम होतात. मग जिया खानसारख्या एका लब्धप्रतिष्ठित कुटुंबातून आलेल्या तरूणीने केवळ चांगल्या दर्जाचे चित्रपट मिळत नाहीत म्हणून मृत्यू जवळ का करावा? जियाची आत्महत्या हे केवळ अभिनेत्री म्हणून आलेल्या अपयशातून नाही. तर त्याला या इंडस्ट्रीत मिळणारे ग्लॅमर हवे म्हणून करावा लागणारा संघर्ष, आणि मग एकदा का तुम्ही त्या ग्लॅमरच्या झोतात आलात की त्याबरोबर येणाऱ्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, असे इथे रुळलेल्या कलाकारांचे म्हणणे आहे.
हिंदी चित्रपटांमध्ये तर येणाऱ्या प्रत्येक चित्रपटागणिक एक नवा चेहरा दाखल होतो आहे. यात स्टार कलाकारांच्या मुलांची फौज जशी आहे तशीच नवोदित कलाकारांची संख्याही मोठी आहे. मात्र, पहिला चित्रपट हिट झाला म्हणजे आपण स्थिरस्थावर झालो, हे गणित अगदी स्टारपुत्र असलेल्या ह्रतिक रोशन आणि रणबीर कपूर यांच्या बाबतीतही खरे ठरलेले नाही. दोघांनाही आपली कारकीर्द घडवण्यासाठी जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडावी लागली. ईशा देओलला दोनदा स्वत:च चित्रपट निर्मिती करून स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न हेमामालिनीने केला. ईशानेही ‘धूम’, मणिरत्नमचा ‘युवा’ असे चांगले चित्रपट केले होते. पण, तरीही तिला यश मिळाले नाही. अखेर निराश ईशाची समजूत घालून तिचे लग्न लावून देण्यात हेमामालिनीने समाधान मानले.
‘मुन्नाभाई’ हिट झाला, ‘लगान’ मध्ये आमिरची नायिका म्हणून ती पुढे आली पण आज ग्रेसी सिंग काय करते हे कोणाला माहीत आहे? नम्रता शिरोडकर, निशा कोठारी, अंतरा माळी, प्रीती झांगियानी, किम शर्मा, सुषमा रेड्डी, समीरा रेड्डी, लिझा रे, आयेशा टाकिया, गायत्री जोशी आदींचा ठावठिकाणा तरी कोणाला माहीत आहे? त्यांनी एकतर लग्न करून आपली चित्रपट करिअर थांबवली आहे. नाहीतर क धीतरी एखाद्या भूमिकेतून त्या झळकतात. हिंदीतली कलाकारांची भाऊ गर्दी हे कारण तर मराठीत त्या संख्येने चांगले चित्रपट येत नाहीत, चांगली कामे मिळत नाहीत म्हणून तिथेही कलाकारांना स्ट्रगल करावा लागतो. विक्रम गोखलेंसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याने मराठीत कलाकार म्हणून नावलौकिक कमवायचा असेल तर तुमचे दुसरे चरितार्थाचे साधन खमके असले पाहिजे, असा सल्ला नवोदितांना दिला होता. आज हिंदीत त्यामानाने चित्रपट, जाहिराती, गाण्यांचे कार्यक्रम, मालिका असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, आपल्याला काय करायचे आहे हे निश्चित असले पाहिजे आणि चांगल्या भूमिकांसाठी संयमाने वाट पाहिली पाहिजे, असाच सल्ला जुन्यांकडून नव्यांना दिला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिताली जगताप
स्ट्रगल प्रत्येकालाच करावा लागतो. अमिताभनाही अजून स्ट्रगल करावा लागतो. त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत हाच काय तो फ रक. माझ्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत मी चारच चित्रपट केले. पण जे मला करावेसे वाटले तेच मी केले. कुठेही तडजोड केली नाही. पण, हे केव्हा होते? कलेवरच्या प्रेमातून तुम्ही संघर्ष करता तेव्हा मनजोगते काम मिळेपर्यंत तुमची वाट पहायची तयारी असते. पण, जे प्रसिध्दी आणि पैसा एवढेच डोक्यात ठेवून या क्षेत्रात येतात ते मात्र अपयशाने कमकुवत होतात आणि नैराश्याच्या गर्तेत सापडतात. एकटेपणाशी तुम्हाला लढता आले पाहिजे. त्यासाठी तुम्ही आयुष्यात इतर गोष्टींना किती प्राधान्य देता, यावर बरेच काही अवलंबून आहे. १०वर्षे वाट पाहिल्यानंतर मला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट आला. पण, म्हणून माझा स्ट्रगल संपलेला नाही. संघर्षांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आशावादी असायला हवा. त्यासाठी तुमच्या घरच्यांनाही तुम्ही विश्वासात घेतले पाहिजे.

रिचा चढ्ढा
हिंदी चित्रपटांमध्ये आजच्या घडीला नवीन कलाकारांसाठी उत्तम संधी आहे. पण, तुम्हाला इथे टिकून रहायचे असेल तर मिळेल त्या पध्दतीने प्रसिध्दीचा मार्ग न अवलंबलेला बरा. माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन वर्षे मी बसून काढली. त्या काळात मी माझ्या घरच्यांना विश्वासात घेऊन सांगितले की सध्या मला चित्रपट मिळत नाहीत. त्यामुळे मला आर्थिक मदत करा. त्या काळात माझ्या खर्चावरही मी नियंत्रण ठेवले होते. दरम्यानच्या काळात मी नाटकांमध्ये काम सुरू केले, काही जाहिराती केल्या. पण, मनाजोगती भूमिका मिळेपर्यंत वाट पाहिली. त्यामुळे कास्टिंग काऊच, काहीतरी वाईट काम के ल्यानंतर येणारी कुप्रसिध्दीची भीती या सगळ्या गोष्टींपासून मी दूर राहिले. आज मला हव्या तशा भूमिका मिळताहेत.

विशाखा सिंग
मी मॉडेल म्हणून सुरुवात केली. तेव्हाही आपला पोर्टफोलिओ घेऊन ठिकठिकाणी जायचे, भेटायचे. मग कामासाठी कोणाचा फोन येतो का?, याची वाट पहायची. या गोष्टी केल्या आहेत. जाहिराती, मॉडेलिंग करता करता दक्षिणेकडे संधी मिळाली म्हणून तिथे चित्रपट केले. आज मला हिंदी चित्रपटांमधून चांगल्या चांगल्या भूमिका मिळत आहेत. पण, म्हणून हे दीर्घकाळ टिकेल असाच विचार करून जगणे शक्य नाही. चित्रपट नसतात तेव्हा अन्य गोष्टींवरही काम करत असते. मी नुकतीच अनुरागच्या एका चित्रपटासाठी प्रेझेन्टर म्हणून काम के ले. याच निमित्ताने मला कान महोत्सवात जाण्याची संधी मिळाली. अभिनेत्री म्हणून जे ग्लॅमर मला हवे आहे ते मी तिथे पाहिले पण, तेच आपल्याला मिळवायचे आहे असा विचार करून त्यामागे मी धावणार नाही. या क्षेत्रात तुम्हाला अपयशातूनही तरून जावे लागते आणि यशाचेही भान ठेवावे लागते.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Struggle is only reality