दावे-निवारण प्रक्रिया गतिमान करताना, दाव्यांच्या निपटाऱ्यात होणाऱ्या तोटय़ाला बांध घालण्यासाठी सामान्य विमा क्षेत्रातील चार सरकारी कंपन्यांनी एकत्र येऊन प्रस्तावित केलेली सामायिक ‘थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (टीपीए)’ कंपनी येत्या सहा महिन्यांत कार्यान्वित होईल, असे या क्षेत्रातील अग्रणी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष जी. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.
सामान्य विमा क्षेत्रातील न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्ससह, जीआयसी, ओरिएण्टल इन्श्युरन्स आणि नॅशनल इन्श्युरन्स या कंपन्यानी सप्टेंबर २०१२ मध्ये सामायिक टीपीएच्या स्थापनेसाठी अधिकृतपणे भागीदारी करीत असल्याची घोषणा केली होती. विशेषत: आरोग्य विमा क्षेत्रात दाव्यांच्या व्यवस्थापनासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या त्रयस्थ संस्थात्मक रचनेला फाटा देऊन, या त्रयस्थ संस्थांना (टीपीएंना) कमिशनपोटी द्याव्या लागणाऱ्या प्रीमियमच्या ६ टक्के इतकी रक्कम वाचवण्याच्या दृष्टीने हे पाऊल उपयुक्त पडेल. अशा त्रयस्थ टीपीएची आजवरची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नसल्याचे श्रीनिवासन यांनी तक्रारवजा सुरात सांगितले.
सध्या प्रस्तावित सामायिक टीपीएसाठी माहिती-तंत्रज्ञानात्मक संरचनेचे काम पूर्ण झाले असून, आवश्यक मनुष्यबळाच्या भरतीचे कामही पूर्ण होत आले आहे, असे श्रीनिवासन यांनी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सच्या आर्थिक वर्ष २०१३-१४ मधील वित्तीय कामगिरीची माहिती देताना सांगितले. कंपनीने सरलेल्या आर्थिक वर्षांत जोखीम अवलोकन आणि दावे व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरीच्या बळावर, ‘लॉस रेशो’ अर्थात दाव्यांचे कमावलेल्या प्रीमियम उत्पन्नाच्या तुलनेत गुणोत्तर हे ८५.५ टक्क्य़ांवरून ८३.५ टक्क्यांवर आणले आहे. परिणामी कंपनीचा करांपूर्वीचा नफा १०११ कोटींवरून उंचावून १२९४ कोटी रुपयांवर गेला, तर निव्वळ नफ्यातही सरलेल्या आर्थिक वर्षांत २९ टक्क्यांची भरीव वाढ झाली आहे. निव्वळ नफा ८४४ कोटींवरून १०८९ कोटींवर गेला आहे. कंपनीने आरोग्य विमा क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या टीपीएकडून येणाऱ्या दाव्यांच्या देखरेखीसाठी डॉक्टर्सना सेवेत सामावून घेतले असून, चालू वर्षांत आणखी काही डॉक्टर्सना सेवेत सामावले जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चालू वर्षांत १६,५०० कोटींचे उद्दिष्ट!
सामान्य विमा क्षेत्रातील अग्रणी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सने आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये निर्धारित १५,००० कोटींच्या लक्ष्याच्या तुलनेत किंचित कमी म्हणजे १४,३०४ कोटींचे उत्पन्न जागतिक स्तरावरील व्यवसायातून विमा हप्त्यांपोटी कमावले. यापैकी भारतातील व्यवसायातील विमा हप्ते उत्पन्नाचा वाटा हा ११,५४० कोटींचा आहे, जो आधीच्या वर्षांच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष २०१४-१५ साठी कंपनीने विमा हप्त्यांपोटी १६,५०० कोटींचे उद्दिष्ट ठेवले असून, यापैकी निव्वळ भारतीय व्यवसायाचा हिस्सा १३,५०० कोटींचा असेल. कंपनीचा परदेशात २२ राष्ट्रांमध्ये व्यवसाय फैलावला असून, चालू वर्षांत म्यानमारसह आणखी दोन ठिकाणी व्यावसायिक विस्ताराचे कंपनीचे नियोजन आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत उभारीचे मिळालेले सुस्पष्ट संकेत, तसेच निवडणुकानंतर केंद्रात स्थिर सरकार येण्याच्या आशा बळावल्या आहेत, असे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले. या बाबी प्रामुख्याने कंपनीच्या औद्योगिक-वाणिज्य (आग, अभियांत्रिकी वगैरे) व्यवसायात वाढीला मदतकारक ठरतील आणि उत्पन्नाबाबत निर्धारित लक्ष्य गाठता येईल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government general insurance companies tap will be activated in six months