देशात अच्छे दिन आल्याचे दिसत चित्र तूर्त नसले तरी सध्या बीड जिल्ह्यातील काही तरुणांचे अच्छे दिन आले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील २५ तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. मुख्यमंत्री दूत आसाराम हातागळे यांनी दुष्काळग्रस्त गावांची यादी मानव विकास प्रतिष्ठान या शासनमान्य संस्थेकडे सुपूर्द केली होती. धारूर, गेवराई आणि लातूर तालुक्यातील तब्बल २५ तरुणांना मुंबई येथील टाटा पॉवर कौशल्य विकास संस्थेत व्यावसायभिमुख प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यातील तरुणाईच्या हाताला रोजगार देण्यासाठी राबवण्यात आलेल्या अभियानाबद्दल गावातील नागरिक समाधानी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे कोळपिंपरी गावातील काही तरुण हे ऊस तोडण्यासाठी कर्नाटक किंवा पश्चिम महाराष्ट्रात जात होते. महेंद्र साळवे आणि राहुल वाघमारे या तरुणांनी हजारो रुपयांची उचल घेतली होती. ही रक्कम परत करण्याची जबाबदारी स्वीकारुन मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना टाटा पॉवर कौशल्य विकास संस्थेत व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. याच गावातील दारू विक्रीचा व्यवसाय करणारा तरुण देखील या प्रशिक्षणात सहभागी झाला आहे. मुंबई येथे त्यांना इलेक्ट्रॉनिक या विभागातील वायरमन कोर्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणार्थींना दोन वेळचे जेवण, एक वेळचा नाश्ता आणि चहा मोफत पुरवण्यात येतोय.

२५ तरुणांपैकी कोळपिंपरी येथील १६ तरुण उपक्रमात सहभागी झाले आहेत. यात शेतकरी, शेतमजूर आणि अनुसूचित जातीमधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा समावेश आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर मानव विकास प्रतिष्ठान या तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन देणार आहे. ‘वॉटर कप स्पर्धेत घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री दूत आसाराम हातागळे आणि कोळपिंपरी गावच्या सरपंच उषा विजयकुमार खुळे यांनी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून आदर्श गावाकडे वाटचाल सुरू केली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed district 25 youths training at tata group mumbai