४५ वर्षांचे बाळकृष्ण मच्छिंद्र सोर गंगापूर तालुक्यातील पालखेड या गावी रोजगार हमीवर जात असत. त्यांचेच मित्र गणपत नामदेवराव सोनवणेही रोहयोच्या कामावरचे मजूर. पाच महिन्यांपासून ऑनलाइन यंत्रणा बिघडली, मजुरी मिळाली नाही. कामावरचा मुकादम सांगत असे, आज-उद्या पैसे मिळतील. नेमके पैसे मिळण्याची वेळ आली आणि हजार आणि पाचशेच्या नोटांवर बंदी आली. बँकांमधली सगळी यंत्रणा नगदी नोटा वाटण्याच्या कामाला लागली. त्यांना रोहयोचे पैसे मजुरांच्या खात्यावर जमा करण्याएवढाही वेळ नाही. परिणामी मराठवाडय़ातील मजुराचे जिणे उधारीवर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठवाडय़ात आजच्या तारखेत १०२८ कामांवर ६ हजार ९१० मजूर आहेत. विशेषत: वनविभागाच्या कामांवर रोजंदारीसाठी येणाऱ्या मजुरांची संख्या अधिक आहे. काही ठिकाणी तुती लागवडीचाही उपक्रम या योजनेतून सुरू आहे. मात्र वेगवेगळ्या कारणांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवरील मजुरांची प्रतिदिन १९२ रुपयांची मजुरी थकली. १ हजार १७२ कामांवरील मजुरांचे ७ कोटी ६४ लाख रुपये अजूनही मिळालेले नाहीत. कुशल कामाची रक्कमही २० कोटींच्या घरात आहे. ही रक्कम दोन दिवसांत येईल आणि पैसे मिळतील, अशी शक्यता निर्माण झाली आणि नोटांच्या बंदीमुळे व्यवहाराच्या मागे मोठी रांग आली. दौलताबाद किल्ल्याजवळील रोपवाटिकेत मजूर म्हणून काम करणारे राजेंद्र नारायणप्रसाद दुबे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून रोजगार हमीवर काम करतो आहे. जॉबकार्ड आहे, नावही खूप पूर्वी नोंदविलेले आहे. मी आणि माझी मालकीण गेल्या काही दिवसांपासून काम करत होतो. एका आठवडय़ाच्या कामाचे ११५२ रुपये माझ्या खात्यावर आले आणि मालकिणीच्या खात्यावर ८७८ रुपये आले. उद्या रक्कम काढायची असे ठरवले आणि बँकांमध्ये रांगाच रांगा लागल्या. मजुरी करायची की रांगेत उभे राहायचे, असा प्रश्न पडला. त्यामुळे किराणा उधारीवर सुरू आहे.

वनखात्याच्या नर्सरीमध्ये रोपवाटिका करण्याचे काम रोजगार हमीअंतर्गत सुरू आहे. वर्षांनुवर्षे रोपलागवड आणि त्याच्या वाढीवर लक्ष देणारे प्रभुदास हजारे आणि रघुनाथ सोनवणे यांना ठरावीक रक्कम मिळते. मात्र अन्य मजुरांना दिवसाची मजुरी प्रतिदिन १९२च्या हिशेबाने. या कामासाठी आलेल्या संगीता जाधव म्हणाल्या, घरी खायची चार तोंडे आहेत. एक मुलगा बारावीत शिकतो, मुलगी नववीत. आम्ही दोघेही मजुरीला येतो. पण गेल्या काही दिवसांत मजुरी काही मिळाली नाही. पालखेडचे सरपंच नंदू जाधव सांगत होते, ‘पाच महिन्यांपासून मजुरी मिळालेली नाही. आता पैसे आले तरी ते पदरी कधी पडतील, हे सांगता येत नाही. शहरातच रांगा लागल्या आहेत. ग्रामीण भागातल्या बँकांमध्ये कोण पैसा पाठवेल?’ नंदू जाधव यांच्या म्हणण्याला बँकेचे अधिकारीही दुजोरा देतात. ग्रामीण भागातल्या बँकांमध्ये पैसेच शिल्लक नाहीत. ‘मग्रारोहयो’मध्ये अलीकडे काही चांगले बदलही झाले. प्रत्येक मजुराचे नाव आता ऑनलाइन आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी बँका नसल्यामुळे मराठवाडय़ातील २ लाख १८ हजार ३१८ मजुरांचे खाते पोस्टामध्ये आहेत.

९२ टक्के मजुरांच्या नोंदी आधारकार्डाशी जोडल्या गेल्या असल्याने बनावट मजुरांची संख्या कमी झाली असल्याचा दावा रोहयोचे अधिकारी करतात. मात्र त्यातही घोटाळे आहेतच. पूर्वी रोहयो म्हणजे ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ अशी म्हण होती. आता मजुरांच्या स्थिती ‘काम कर आणि वाट बघ’ अशी झाली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment issue in aurangabad