छत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. लोहा तालुक्यात दोघांचा बुडून तर किनवट तालुक्यातील दोघांचा अपघाती मृत्यू झाला. जोरदार धडक बसल्यानंतर चक्काचूर झालेली दुचाकी ट्रक खाली आली. त्यामुळे पेट्रोलची टाकी फुटून पेट घेतला आणि आगीच्या भडक्यात ट्रक जळून खाक झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच तर दुसऱ्याचा गंभीर जखमी होऊन उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. ही घटना नांदेड महामार्गावरील सावरी घाटामध्ये रविवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किनवट तालुक्यातील येंदापेंदा जवळील नागडोह या गावचे रहिवासी माधव दादाराव कार्लेवाड (वय ३५) व शिवाजी कोंडबा तिगलवाड (वय ६०) हे दोघेही दुचाकीने तेलंगणातील आडेली पोच्चव्वा येथे देवीच्या दर्शनासाठी नांदेडमार्गे शिवणी फाट्याकडे जात होते. बोधडी ओलांडून सावरी घाटात आल्यानंतर समोरून सुसाट वेगाने येणाऱ्या एक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. त्यात त्यांची दुचाकी ट्रकखाली येऊन ते सुमारे एक ते दीड फर्लांग फरफटत गेले. त्यात दुचाकीच्या मागे बसलेले शिवाजी तिगलवाड हे जागीच ठार झाले तर चालक शिवाजी कार्लेवाड हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, ट्रकखाली आलेल्या दुचाकीचे अक्षरश: तुकडे उडून रस्त्यावर विखुरल्या गेले. त्यातच पेट्रोल टाकी फुटल्याने आगीचा भडका उडून ट्रकनेही भीषण पेट घेतला.

हेही वाचा : तेवीस मंडळांत दमदार पाऊस; धाराशिव, कळंब तालुक्याला मोठ्या पावसाची प्रतिक्षा

दरम्यान रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी प्रसंगावधान राखून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काहींनी मृत व जखमीस गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेत असतांना जखमी माधव कार्लेवाड यांचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात कर्तव्यावरील डॉ. मुंगळकर यांनी जखमी माधव यास तपासल्यानंतर मृत घोषित केले. येंदापेंदाचे उपसरपंच शिवाजी व्यंकटी भताने यांचेसह ग्रामस्थ व नातेवाईकांनी पार्थिव ताब्यात घेतले. राजू तिगलवाड याने किनवट ठाण्यात अपघाताची फिर्याद नोंदवली. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचा : बीडमध्ये तणाव; पंकजा मुंडेंनंतर मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान

तरुणांचा बुडून मृत्यू

लोहा तालुक्यातील बेटसांगवी येथील दोन तरुणांचा विहिरीत पोहायला गेल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली. बेटसांगवी येथील तरुण शेतकरी संतोष सखाराम वानखेडे (वय २२) आणि राजेश गणेशराव वानखेडे (१७) हे शेतामध्ये पेरणीचे काम आटोपून घराकडे परतत होते. यावेळी त्यांना उष्णतेमुळे विहिरीमध्ये पोहण्याची इच्छा झाली. त्यामुळे दोघेही विहिरीवर जावून पोहायला उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. संतोष वानखेडे यांच्या पश्चात आई, वडील व दोन बहिण तर राजेश वानखेडेला आई-वडिलांसह एक भाऊ आहे. दोन्ही तरुणांची विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून बेटसांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nanded 4 died as two in accident and two drowned css