‘‘तुला माहीत आहे ना रे किशोर, माझी टंगळमंगळ करायची जुनी खोड.’’ रोहनने असं विचारताच किशोरला हसू आवरेना.
‘‘हो रे.. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना खूप प्रश्न विचारत राहायचास आणि मग ती गोष्ट करायची राहायचीच.’’ हसत हसत किशोर म्हणाला.
‘‘हो ना, एक तर ती गोष्ट माझ्या हातून घडायची नाही आणि त्याबद्दल मनात सारखी खंत वाटत राहायची. त्यातून वाईट वाटायचं, स्वत:चा किंवा इतरांचा राग यायचा, रडायलाही यायचं.’’ रोहन गंभीरपणे म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहन गंभीर झालेला पाहून किशोरही लक्षपूर्वक ऐकू लागला. ‘‘किशोर, अरे आजीनेच माझी ही सवय माझ्या लक्षात आणून दिली आणि त्याचं कारणही सांगितलं. कोणतंही काम सुरू करण्याआधीच मी फार विचार करायचो आणि अनेक प्रश्न निर्माण करायचो. जसं की ‘मला हे कसं जमणार?’, ‘एवढं काम! कसं होणार?’, ‘हे सगळं करायला वेळ मिळेल का!’ या प्रश्नांची उत्तरं मिळायचीच नाहीत, पण त्या प्रश्नांमुळे मला राग, चीड, रडू वगैरे यायचं आणि जे काम सुरू करायचं असेल ते सुरू करणं राहूनच जायचं.
आजीने हे सारं पाहिलं आणि ती म्हणाली, ‘‘सुरू तर करा. सुरू केल्यावर कदाचित चालू राहील किंवा राहणार नाही, जमेल किंवा जमणार नाही, पण हे नको असलेले प्रश्न आणि त्यामुळे होणारा गोंधळ उरणार नाही मनात.’’

‘‘मग लगेच केलीस तू सुरुवात आजीच्या म्हणण्याप्रमाणे?’’
‘‘लगेच नाही, पण आजीचं म्हणणं ऐकून तर पाहू म्हणून काही गोष्टींची सुरुवात केली. काही जमल्या तर काही जमल्या नाहीत, काही चालू राहिल्या तर काही थांबल्या, पण मनातला विचारांचा घोळ आणि त्यामुळे होणारी टंगळमंगळ मात्र पूर्णपणे थांबली.’’
यावर किशोरने ‘‘हं’’ म्हणत मान डोलावली. त्याला पटतंय हे पाहून रोहन म्हणाला, ‘‘खोल समुद्रात असलेला मोती जर का मिळवायचा असेल तर पाण्यात पहिलं पाऊल तर टाकलं पाहिजे.’’ असं आजी म्हणते रे..

joshimeghana.23@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang balmaifal a moral story fo kids amy