यूपीएससी परीक्षा देण्याचे निश्चित केल्यानंतर अभ्यासाच्या नियोजनाच्या दृष्टीने मूलभूत तयारी करणे क्रमप्राप्त ठरते. या प्राथमिक तयारीतील विविध टप्प्यांची ओळख करून घेऊयात..
यूपीएससी परीक्षेच्या तयारीच्या प्रक्रियेची चर्चा प्रारंभापासून करणे उपयुक्त ठरते. या परीक्षेचा अभ्यास प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी काही प्राथमिक स्वरूपाची तयारी करणे अत्यावश्यक आहे. याला यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीची जुळवाजुळव असेही म्हणता येईल आणि पुढील मुद्दय़ांच्या आधारे ही पूर्वतयारी करता येणे सहजशक्य आहे.
यूपीएससी परीक्षेचे स्वरूप जाणून घ्या.
यूपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने सर्वप्रथम या परीक्षेचे स्पर्धात्मक स्वरूप सविस्तरपणे जाणून घेणे आवश्यक आहे. या परीक्षेत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत (अर्थात व्यक्तिमत्त्व चाचणी) अशा तीन वेगळ्या टप्प्यांचा समावेश असतो. यातील पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची, बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित आणि नकारात्मक गुणपद्धत असलेली आहे.
पूर्वपरीक्षेचा हा प्राथमिक टप्पा ‘पात्रता चाचणी’ स्वरूपाचा आहे. म्हणजेच या परीक्षेत प्राप्त होणारे गुण या टप्प्यापुरतेच ग्राह्य़ धरले जातात. यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पुढील प्रवास सुरू होतो. वस्तुनिष्ठ व नकारात्मक गुणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी नेमकेपणाने आणि अचूक अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. मूलभूत संकल्पना समजून घेणे, आवश्यक माहितीचे पुन:पुन्हा वाचन करणे, अभ्यास पक्का करणे, स्मरणशक्तीचा विकास करणे, प्रश्नाखालील चुकीचे पर्याय वगळून योग्य पर्यायाकडे जाण्याचे कौशल्य या आधारेच यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत यश संपादन करणे शक्य होते. थोडक्यात, पूर्वपरीक्षेचे स्वरूप लक्षात न घेता सुरू केलेला अभ्यास पुरेसा ठरणार नाही, हे लक्षात घेऊन आपल्या अभ्यासाचे धोरण निश्चित करावे.
मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असते. हे लक्षात घेत अभ्यासात आवश्यक ते बदल करणे निकडीचे ठरते. व्यक्तिमत्त्व चाचणीच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. उमेदवाराने आयोगाकडे पाठवलेली व्यक्तिगत माहिती, वैकल्पिक विषय, चालू घडामोडी आणि नागरी सेवेविषयी काही मूलभूत प्रश्न या अनुषंगाने मुलाखतीत प्रश्न विचारले जातात. मुलाखत ही संवादाच्या स्वरूपातील तोंडी परीक्षा असल्यामुळे सदस्यांनी विचारलेले प्रश्न व्यवस्थितपणे ऐकून समजून घेणे, त्याविषयी आपले मत योग्य रीतीने मुलाखत मंडळासमोर मांडणे, आपल्या आवाजाचा पोत व पातळी योग्य राखणे, औपचारिक भाषेचा वापर करणे, देहबोली आत्मविश्वासपूर्वक असणे, तसेच संभाषणात आवश्यक ती औपचारिकता राखणे या सर्वाचे भान ठेवणे गरजेचे आहे. मुलाखतीच्या स्वरूपानुसारच आपल्या तयारीला दिशा द्यावी लागते. म्हणजेच प्रत्येक टप्प्याचे वेगळेपण लक्षात घेऊन त्या प्रकारची अभ्यासपद्धतीचा अवलंब करावा लागतो.
अभ्यासक्रम समजून घ्या..
केंद्र लोकसेवा आयोगाने या दोन्ही टप्प्यांतील विषयांचा अभ्यासक्रम रीतसर नमूद केला आहे. या अभ्यासक्रमाचे बारकाईने वाचन करा आणि तो समजून घ्या. पूर्वपरीक्षेत ‘सामान्य अध्ययन’ आणि ‘नागरी सेवा कलचाचणी’ हे दोन विषय तर मुख्य परीक्षेत निबंध, सामान्य अध्ययन (चार पेपर), वैकल्पिक विषय आणि अनिवार्य इंग्रजी तसेच भारतीय भाषा या विषयांचा समावेश आहे. अभ्यासाच्या आकलनाद्वारे एखाद्या ‘विषयाची व्याप्ती’ किती आहे याचा अंदाज मांडणे शक्य होते. ‘अभ्यास व वेळेचे नियोजन’ करताना प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे आकलन पायाभूत ठरते. मुलाखतीसाठी औपचारिकपणे अभ्यासक्रम निर्धारित केलेला नसला तर वर उल्लेख केलेल्या घटकांची तयारी करणे महत्त्वाचे आहे.
प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा.
परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात जे विषय समाविष्ट केले आहेत, त्यावरील गेल्या पाच-सहा वर्षांतील आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे अत्यंत उपयुक्त ठरते. पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कलचाचणी या विषयांच्या किमान २०११ पासूनच्या प्रश्नपत्रिका पाहाव्यात. मुख्य परीक्षेच्या बाबतीत जरी २०१३ पासून नवी परीक्षा योजना स्वीकारली तरी सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय आणि निबंधाच्या जुन्या पद्धतीतील प्रश्नपत्रिका अभ्यासासाठी उपयुक्त ठरतात.
प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे प्रत्येक वर्षांची संबंधित विषयावरील प्रश्नपत्रिका बारकाईने वाचणे; प्रत्येक प्रश्न कोणत्या प्रकरणावर अथवा अभ्यास घटकावर आधारित आहे हे पाहणे; त्या प्रश्नाचे स्वरूप संकल्पनात्मक, माहितीप्रधान अथवा विश्लेषणात्मक आहे हे लक्षात घेणे; प्रश्नात चालू घडामोडींचे विविध दृष्टिकोनांविषयी अथवा संबंधित घटकाच्या भवितव्याविषयी काही विचारले आहे का हे जाणून घेणे होय. त्याखेरीज प्रश्न वर्णनात्मक, चर्चात्मक, स्पष्टीकरणात्मक, चिकित्सक, मूल्यमापनात्मक की उपाययोजनात्मक आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने चार-पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका बारकाईने अभ्यासल्यास त्या त्या विषयाच्या ‘अभ्यासाची व्याप्ती’ ठरवणे जसे शक्य होईल तसेच अभ्यास ‘परीक्षाभिमुख’ करणे सोपे जाईल. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून जे बारकावे लक्षात येतील त्याचा समावेश अभ्यासात सुरुवातीपासून करता येईल.
संदर्भपुस्तकांची यादी बनवा.
या तीन घटकांच्या तयारीसोबतच परीक्षेसाठी आवश्यक संदर्भ पुस्तकांची यादी बनवणे क्रमप्राप्त ठरते. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न लक्षात घेऊनच संदर्भाची यादी निश्चित करावी. त्या दृष्टीने विचार केल्यास ‘एनसीईआरटी’ची इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यघटना, विज्ञान-तंत्रज्ञान, समाजरचना आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांवरील क्रमिक पुस्तके हा प्राथमिक संदर्भ ठरतो. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी किमान एक प्रमाणित संदर्भपुस्तक वाचणे महत्त्वाचे ठरते. काही वेळा दुसरा एखादा संदर्भग्रंथ वाचायचा असल्यास त्याचीही तयारी ठेवावी.
यूपीएससीची तयारी करताना मराठी वर्तमानपत्रासोबतच इंग्रजीतील एक वर्तमानपत्र, काही नियतकालिके आणि भारत वार्षकिी या संदर्भसाहित्याचे वाचन करणे अत्यावश्यक आहे. अशा रीतीने ‘एनसीईआरटी’द्वारा विषयाचा संकल्पनात्मक पाया, प्रमाणित संदर्भग्रंथ याद्वारे संबंधित विषय सविस्तर समजून घेणे आणि वर्तमानपत्र, नियतकालिके यांच्या सहाय्याने चालू घडामोडींविषयक दृष्टिकोन पक्काकरणे सोपे जाते.
संदर्भसाहित्याविषयी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यावश्यक ठरते, ती म्हणजे असंख्य पुस्तके वाचण्यापेक्षा त्या त्या विषयांची मूलभूत एखाद-दुसरे संदर्भपुस्तक पुन:पुन्हा वाचून तो पक्का करण्यावर भर द्यावा. त्यामुळे प्रारंभीच कोणती संदर्भपुस्तके वाचायची आहेत हे विचारपूर्वक ठरवणे महत्त्वाचे आहे.
अभ्यासाचे नियोजन
प्राथमिक तयारीतील अखेरचा मात्र तितकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे अभ्यास व वेळेचे नियोजन होय. यूपीएससी परीक्षेचे स्वरूप, विविध टप्पे, त्यातील विषय, अभ्यासक्रम, त्यासंबंधित विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे विश्लेषण आणि संदर्भपुस्तके हे घटक समजून घेत अभ्यासाचे ‘नियोजन’ करणे आवश्यक आहे.
– तुकाराम जाधव