‘स्त्री चळवळीची पन्नाशी’ या सदरातील सर्व लेख मी वाचत असतो. १० मेच्या अंकातील ‘देहीचा विटाळ देहीच जन्मला…’ हा लेख वाचला. ग्रामीण भागातील वा अल्प उत्पन्न गटातील स्त्रियांना मासिक पाळीच्या दिवसांत ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्या संदर्भात जनजागृती करण्याचं कार्य या लेखाद्वारे निश्चित झालं आहे. सॅनिटरी पॅड्सचा वापर त्या काळी तितकासा प्रचलित नव्हता. शिवाय आर्थिक परिस्थिती हे एक कारणही होतेच, आता मात्र शहरांमध्ये पॅड्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे, पण हल्ली शहरांमधील स्त्रियांनी वापरलेल्या पॅड्सचे संकलन व विल्हेवाट ही समस्या होऊ लागली आहे. आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या समस्येकडे पाहण्याची आवश्यकता लेखात सांगितली होती. शास्त्रीय पद्धतीने पॅड्सची विल्हेवाट कशी लावावी याविषयी लेखात माहितीही देण्यात आली आहे. यासंदर्भात, जागृती होण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.– निशिकांत मुपीड
मूकबधिरांचे प्रश्न कोण समजून घेणार?
‘…आणि आम्ही जिंकलो’ हा ऊर्मिला आगरकर लिखित (१० मे) हृदयस्पर्शी लेख वाचून माझ्याही आयुष्यातील अनुभवाचा चित्रपट डोळ्यासमोर दिसू लागला. माझा मुलगा आशुतोष डोंबिवलीतील ‘मॉडेल प्रायमरी शाळे’त केजीमध्ये शिकत होता. तेव्हा अचानक त्याची अभ्यासात प्रगती होईनाशी झाली. म्हणून बालरोगतज्ज्ञ आणि कान, नाक, घसा तज्ज्ञांकडून तपासणी केल्यावर तो कर्णबधिर असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला मुंबई सेंट्रल येथील कर्णबधिर शाळेत घातले. डोंबिवलीतील ‘जे.जे.’चे कलाशिक्षक दीक्षित सरांच्या मार्गदर्शनाखाली आशुतोषने ड्रॉइंगची इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर १०वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याने ‘रहेजा स्कूल ऑफ आर्ट’मधून पदविका मिळवली. यामुळे त्याला ‘यूटीव्ही’मध्ये कार्टून आर्टिस्ट म्हणून नोकरी मिळाली. पाच वर्षांनी ते बंद झाल्यानंतर त्याने थ्रीडी अॅनिमेशनचा वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तरीही पुन्हा न संपणारा प्रश्न तो म्हणजे नोकरीचा. पारिख नावाच्या सद्गृृहस्थांमुळे एका स्टुडिओत त्याला नोकरी मिळाली. वीसेक वर्षं चांगली गेली. जरा निवांत झालो होतो, तो परत आशुतोषच्या नोकरीत रिसेशनमुळे ब्रेक. असे हे मूकबधिरांचे प्रश्न कोण समजून घेणार?– राघवन मन्नूर