पीटीआय, नवी दिल्ली, चंडीगड : आम आदमी पक्ष ‘इंडिया’ आघाडीला बांधील असल्याची ग्वाही दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दिली. आपला पक्ष या आघाडीपासून दूर जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आपची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये काँग्रेस आमदार सुखपाल सिंग खैरा यांच्या अटकेवरून वाद निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी येथे पत्रकार परिषदेत हा खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे, आपल्याला सुखपाल सिंग खैरा यांची भेट घेऊ दिली जात नसल्याची तक्रार राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केली आहे. खैरा यांना गुरुवारी अटक करण्यात आली. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पंजाबच्या फजिल्का जिल्ह्यात ठेवण्यात आले आहे. पंजाब काँग्रेसचे नेते प्रताप सिंह बाज्वा आणि अमिरदर सिंह राजा वारिंग हे शुक्रवारी त्यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, आपल्याला खैरा यांची भेट घेऊ दिली नाही अशी तक्रार त्यांनी केली. खैरा यांना २०१५च्या अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर सत्ताधारी आप सूडाचे राजकारण करत असल्याची टीका पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

आठ ते १० दिवसांत घटक पक्षांशी चर्चा – पवार

दरम्यान, राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी घटक पक्षांमध्ये वाद होणार नाहीत याची ‘इंडिया’ आघाडीतर्फे खबरदारी घेतली जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना व्यक्त केला. मुंबईमध्ये परतल्यानंतर काँग्रेस आणि अन्य पक्षांशी यासंबंधी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील आठ ते १० दिवसांमध्ये ही चर्चा सुरू होईल असे त्यांनी सांगितले.

आप ‘इंडिया’ आघाडीला बांधील आहे. आम्ही आघाडीपासून दूर जाणार नाही. आम्ही आघाडी धर्माचे पालन करण्यास कटिबद्ध आहोत. – अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय समन्वयक, आप

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap committed to india alliance arvind kejriwal testimony ysh