पीटीआय, गुवाहटी / इटानगर
मुसळधार पाऊसामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश राज्यांमधील पूरस्थिती गुरुवारीही कायम होती. आसाममधील २१ जिल्ह्यांमधील सुमारे सात लाख लोक प्रभावित झाले आणि प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर तर संततधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशमधील २४ जिल्ह्यांत ३३ हजारहून अधिक लोक प्रभावित झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली,
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या १९ वर पोहोचली, यात बुधवारी दोघांचा मृत्यू झाला. तसेच कछार जिल्ह्यात एक व्यक्ती बेपत्ता झाली. अरुणाचल प्रदेशमध्ये यावर्षी पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान १२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर एका बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरच्या (एसईओसी) अहवालात म्हटले आहे.
आसाममध्ये तीन ठिकाणी ब्रह्मपुत्रासह इतर नऊ प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त वाहत होत्या. कछार जिल्ह्यात बराक नदी आणि तिच्या उपनद्याही धोक्याच्या पातळीहून अधिक क्षमतेने वाहत होत्या. आसाममध्ये पुरामुळे ६६ महसूल मंडळांमधील १,४९४ गावे प्रभावित झाली आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) माहितीनुसार, राज्यातील श्रीभूमीतील २ लाख ५९ हजार ६०१ लोकसंख्या पुराच्या पाण्याने प्रभावित झाली आहे. त्यानंतर हैलाकांडी येथील १,७२,४३९ आणि नागाव येथील सुमारे १,०२,७१६ लोकसंख्या पुराच्या वेढ्यात आहे. पुरामुळे राज्यातील १४९७७.९९ हेक्टरवरील पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सिक्कीममधून ६३ जणांची सुटका
गंगटोक : उत्तर सिक्कीममधील चाटेन (जि. मंगन) येथे भूस्खलनात अडकलेल्या एकूण ६३ नागरिकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामध्ये बहुतांश पर्यटकांचा समावेश आहे. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून चाटेन येथे बचावकार्य सुरू असून, अद्याप ६४ पर्यटक अडकल्याचे प्रशासनाने सांगितले. खराब हवामान आणि आव्हानात्मक भूप्रदेशामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्याने हे काम थांबवण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. १ जून रोजी सायंकाळी चाटेन येथील लष्करी छावणीवर भूस्खलन झाल्याची घटना घडली होती. यात तीन जवानांचा मृत्यू झाला, तर सहा जवान बेपत्ता आणि अनेक जण जखमी झाले. बेपत्ता जवानांचा शोध घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.