उत्तराखंडमधील प्रचारसभेत तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेले भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख बिपिन रावत यांचं कटआऊट वापरल्याने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसविरोधात संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीका करत अपरिपक्व पार्ट-टाइम राजकारणी असल्याचं म्हटलं. इतक्या जुन्या पक्षाने आपल्या राजकीय फायद्यासाठी संरक्षण दलांचा वापर करणं ही लाजिरवाणी बाब असल्याचं म्हणत यावेळी त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आज मी राहुल गांधींचं भाषण ऐकलं. त्यांनी बिपिन रावत यांचं कटआऊट वापरलं. विशेष म्हणजे बिपिन रावत यांची सीडीएसपदी नियुक्ती करण्याला त्यांचा विरोध होता. त्यांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. आता फक्त निवडणूक आहे म्हणून रॅलीमध्ये ते त्यांचे कटआऊट वापरत आहेत,” असं प्रल्हाद जोशी यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना म्हटलं.

“काँग्रेसला आपल्या देशाचा इतिहास माहिती नाही. हे सर्व अपरिपक्व अर्धवेळ राजकारणी आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे. राहुल गांधी एक अपरिपक्व अर्धवेळ राजकारणी आहेत,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

काँग्रेस पक्षाने गुरुवारी ‘विजय सन्मान रॅली’मध्ये बिपिन रावत यांचं मोठं कटआऊट लावलं होतं. देहरादून येथे पार पडलेल्या या रॅलीत इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांच्या फोटोच्या मधे बिपिन रावत यांचा फोटो होता. यानिमित्ताने बिपिन रावत यांचं आणि देहरादूनचं नातं दाखवण्याचा प्रयत्न होता.

भाजपाने हा संरक्षण दलांचा अपमान असल्याची टीका केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी टीका करता म्हटलं आहे की, “काँग्रेसने कधीही संरक्षण दलांना मान दिला नाही. त्यांनी नेहमीच प्रश्न उपस्थित करत शंका घेतली. आता निवडणुका आल्यानंतर मतांसाठी त्यांचा वापर करत आहेत”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pralhad joshi calls congress rahul gandhi immature part time politician bipin rawat cutout row sgy