Blackout in Jammu amide india pakistan tension : २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबध चांगलेच ताणले गेले आहेत. यादरम्यान पाकिस्तानकडून आंतराराष्ट्रीय सीमा रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. एक दिवसापूर्वीच पाकिस्तानकडून जम्मू शहरावर डागलेली क्षेपणास्त्रे हाणून पाडल्यानंतर आज शुक्रवारी पुन्हा जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले, तसेच शहरात सायरनचे आवाज ऐकायला मिळाले. रात्री ८.३० च्या सुमारास शहरात स्फोटांचे आवाज देखील ऐकायला मिळाले. द इंडियन एक्सप्रेसने यांसंबंधीचे वृत्त दिले आहे.

“जम्मूमध्ये आता ब्लॅकआउट आहे . शहरात सायरन ऐकू येत आहेत,” अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स वर पोस्ट करत दिली आहे. ओमर अब्दुल्ला हे सध्या जम्मूमध्ये आहेत. “मी जिथे आहे तिथून आता अधूनमधून स्फोटांचे आवाज ऐकू येतात, कदाचित जोरदार तोफखाना,” त्यांनी पोस्ट केले. मी जिथे आहे तिथून आता अधूनमधून स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, कदाचित मोठी आर्टिलरी असावी, असेही अब्दुल्ला म्हणाले आहेत.

रात्री ८ वाजून गेल्यानंतर जम्मू शहरात ब्लॅकआउट लागू केल्याची माहिती स्थानिकांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

पाकिस्तानकडून लष्कराच्या जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या दुसऱ्या दिवशी जम्मूमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचा प्रकार समोर आला आहे.

आकाशात क्षेपणास्त्रे दिसून आल्यानंतर जम्मूमध्ये गुरुवारी रात्री देखील अनेक तास ब्लॅकआउट ठेवण्यात आला होता. मध्यरात्रीच्या आधी एक हल्ला परतवून लावण्यात आल्यानंतर शुक्रवारी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी देखील पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जम्मूमध्ये दिवसाचे कामकाज पूर्वीप्रमाणे सुरू झाल्याचे पाहायला मिळाले होते. शुक्रवारी व्यावसाय, बँका आणि सरकारी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू होती. वैद्यकीय महाविद्यालये सोडून सर्व शाळा आणि महाविद्यालये १२ मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.