महेश सरलष्कर, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एनडीए’मध्ये मदतीला दोन बाबू आले नसते तर भाजपला बहुमताचा आकडाही गाठणे कठीण झाले असते. हे दोन बाबू म्हणजे आंध्र प्रदेशमधील ‘तेलुगु देसम’चे प्रमुख चंद्रबाबू नायडू आणि बिहारमध्ये जनता दलाचे (सं) प्रमुख नितिशकुमार. केंद्रातील ‘मोदी ३.०’ सरकारमध्ये या दोन बाबूंना महत्त्व प्राप्त होईल असे संकेत मिळू लागले आहेत.

हे दोन्ही बाबू भाजपशी सातत्याने लपंडाव खेळत होते. २०१४ मध्ये तेलुगु देसम ‘एनडीए’चा घटक पक्ष होता. मात्र, आंध्र प्रदेशला विशेष राज्यांचा दर्जा न मिळाल्याने चंद्राबाबू यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा अपयशी प्रयत्न केला होता. त्यावेळी ‘वायएसआर काँग्रेस’च्या जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत व लोकसभा निवडणुकीत निर्भेळ यश मिळवल्यामुळे चंद्राबाबू राजकीय अडगळीत पडले होते. त्यातून बाहेर येण्यासाठी चंद्रबाबू नायडूंनी आंध्र प्रदेशमध्ये भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन विरोधातील जनमताचा फायदा मिळवता येऊ शकतो असा विचार करून भाजपनेही तेलुगु देसमशी युती केली. आंध्र प्रदेशमध्ये भाजपची फारशी ताकद नसली तरी तेलुगु देसम व पवन कुमार यांच्या जनसेना पक्षांमुळे भाजपला आंध्र प्रदेशामध्ये आधार मिळाला. २०१९ मध्ये वायएसआर काँग्रेसला २२ तर, तेलुगु देसमला ३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी चित्र उलटे झाले आहे. तेलुगु देसममुळे ‘एनडीए’ बहुमतापर्यंत पोहोचला.

हेही वाचा >>>जुन्या मित्रांबरोबर लवकरच चर्चा; निकालानंतर राहुल गांधी यांची घोषणा, खरगे यांचा मोदींवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने बिहार गमावले होते. ‘एनडीए’तील घटक पक्ष जनता दल (सं)च्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी होतील असा भाजपच्या नेत्यांचा अंदाज होता. पण, बिहारमध्ये ‘एनडीए’चे अपेक्षेपेक्षा कमी नुकसान झाले आहे. २०१९ मध्ये ४० पैकी ३९ जागा ‘एनडीए’ला मिळाल्या होत्या. यावेळीही ‘एनडीए’ ३० जागांच्या आसपास पोहोचला. नितीश कुमार यांच्या जनता दलाने (सं) राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करून राज्यातील सत्ता टिकवून ठेवली होती. त्यानंतर नितीशकुमार यांनी भाजपला पराभूत करण्याचा चंग बांधला होता. ‘इंडिया’ आघाडीच्या स्थापनेतील प्रमुख नेते नितीशकुमारच होते. पण, ‘इंडिया’ आघाडीमध्ये त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार न घोषित केल्यामुळे नाराज नितीशकुमार पुन्हा ‘एनडीए’ला जाऊन मिळाले. नितीशकुमार कुर्मी या ओबीसी समाजातील असून नितीशकुमार कुठल्याही आघाडीत गेले तरी त्यांच्या समाजाची मते त्यांच्याकडे कायम राहतात. त्याचाच फायदा यावेळी बिहारमध्ये भाजपला मिळाल्यामुळे ‘एनडीए’ला महागठबंधन जास्त जागा मिळवू दिल्या नाहीत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrababu naidu the telugu desam chief in andhra pradesh and nitish kumar the janata dal nc chief in bihar are two of the nda importance for the bjp amy