China-India Relations : अलीकडच्या काळात जेव्हा-जेव्हा बातम्यांमध्ये चीनचा उल्लेख येतो तेव्हा-तेव्हा सीमेवर तणाव, लडाखमध्ये तणाव, गलवान खोऱ्यातील चकमकी, उभय देशांमधील व्यापारामधील स्पर्धेचा संदर्भ असतो. मात्र, यावेळी थोडी वेगळी घटना समोर आली आहे. यावेळी चीनने भारताचे आभार मानले आहेत. चीन नेहमी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर टीका करताना, भारताला पाण्यात पाहताना दिसतो. मात्र, यावेळी चीनने भारताचं कौतुक केलं आहे. चीनने भारताचं कौतुक करण्याचं किंवा भारताचे आभार मानण्याचं कारण वाचून तुम्हाला भारताचा अभिमान वाटेल.
केरळमधील अजीखल किनाऱ्यापासून ४४ नॉटिकल मैल दूर समुद्रात ९ जून रोजी एमव्ही व्हॅन है ५०३ (MV Wan Hai 503) नावाच्या एक मालवाहू जहाजात मोठा स्फोट झाला. बघता बघता जहाजावरील मालाने पेट घेतला. या जहाजावर १४ चिनी नागरिक (सहा तैवानी नागरिकांसह) होते. तसेच पाच जण म्यानमारचे व तीन इंडोनेशियन मिळून एकूण २२ जण होते. या २२ जणांकडे स्वतःला वाचवण्याचा कोणताही मार्ग नव्हता, आगीत होरपळून आपण मरून जाऊ असं त्यांना वाटू लागलं होतं. त्याचवेळी भारतीय नौदल देवदूतासारखं त्यांच्या मदतीला धावलं.
चिनी नागरिकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाकडून ताकद पणाला
भारतीय नौदलाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर नौदलाने आयएनएस सुरत हे जहाज MV Wan Hai 503 च्या मदतीसाठी रवाना केलं. तर आयएनएस गरुडाने एक डोर्नियर विमान पाठवलं. चिनी जहाजावरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाने पूर्ण ताकद पणाला लावली. भारतीय तटरक्षक दलाने देखील त्यांची जहाजं मदतीसाठी पाठवली. एकाच वेळी पाच मोठी जहाजं आणि सी-१४४ विमान देखील MV Wan Hai 503 च्या मदतीसाठी पाठवण्यात आलं होतं. या सर्वांनी मिळून जहाजावरील २२ जणांचा जीव वाचवला.
दरम्यान, भारतीय नौदलाने केलेल्या या कामगिरीचं चीनने कौतुक केलं आहे. भारतातील चीनचे राजदूत यू जिंग यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की भारतीय नौदल व मुंबई तटरक्षक दलाचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या लोकांचा जीव वाचवला आहे. यू जिंग यांची ही पोस्ट पाहून किंवा चीनने भारताचं आभार मानल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं. कारण नेहमी भारतीय लष्करावर टीका करणाऱ्या चीनने अचानक भारताचं कौतुक कसं काय केलं.
© IE Online Media Services (P) Ltd