उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी राजधानी लखनऊमधील आरोग्य व्यवस्था ही राम भरोसे असल्याचं चित्र दिसत आहे. करोनाबाधितांना फोन करुन त्यांच्या आरोग्यासंदर्भात विचारपूस करणारी यंत्रणा तर अगदीच बिकट परिस्थितीमध्ये आहे. करोनाबाधितांना फोन करुन त्यांच्या आरोग्यासंदर्भात विचारपूस करणारी यंत्रणेची पोलखोल करणारे काही धक्कादायक प्रकार समोर आले असून याबद्दल नाराजी व्यक्त केली जातेय. दोन महिन्यापूर्वी करोना  पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण बरे झालेत की त्यांचा मृत्यू झालाय याचा तपास आरोग्य यंत्रणेमार्फत आता फोनवरुन केला जात आहे. या सर्व गोंधळामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेले नातेवाईक इतके नाजार आहेत की अनेकजण या कॉलला प्रतिसादच देत नाहीत किंवा थेट कर्मचाऱ्यांना त्यांच्या असंवेदनशील वागणुकीबद्दल नाराजी बोलून दाखवत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वागणुकीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> कहर… गप्पा मारता मारता नर्सने पाच मिनिटांमध्ये एकाच व्यक्तीला दिले करोना लसीचे दोन डोस

मागील काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींना आरोग्य विभागाकडून फोन केले जात आहेत. फोनवरुनच करोनाबाधित रुग्णाच्या आरोग्याची चौकशी केली जात आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार गोमतीनगर येथील रहिवाशी आणि बलरामपूर रुग्णालयाचे माजी आरोग्य अधीक्षक डॉ. डी. पी. मिश्रा यांची पत्नी कुमुद यांना करोनाचा संसर्ग झाला होता. २७ एप्रिल रोजी उपचारादरम्यान कुमुद यांचं निधन झालं. कोविन पोर्टलवर कुमुद यांना करोनाची लागण झाल्याची माहिती अपलोड करुन दीड महिना झाल्यानंतर आरोग्य विभागाला जागा आली. २७ एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या कुमुद यांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने नुकताच डॉ. डी. पी. मिश्रा यांना फोन केला होता. संतापलेल्या मिश्रा यांनी फोन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.

नक्की वाचा >> करोना हे सरकारचं षडयंत्र, रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे लोक मास्क लावतात : महंत नरसिंहानंद

घरी परतलेल्यांना कॉल

अशाचप्रकारे आशियाना येथे राहणाऱ्या सरिता द्विवेदी यांना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या. मागील आठवड्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी फोनवरुन सरिता यांच्या आरोग्यासंदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सरिता यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. अशी दोनच प्रकरणं नाही तर अनेक अशा रुग्णांना सध्या फोन करुन त्यांच्या आरोग्याची चौकशी केली जात आहे जे महिन्याभरापूर्वीच करोनामुक्त होऊन रुग्णालयांमधून घरी परतलेत.

नक्की वाचा >> Coronavirus in UP : बेड्सची कमतरता असल्याने रुग्णांना घरुनच आणाव्या लागत आहेत खाटा

नातेवाईकांचा संताप

करोनावर मात केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने रुग्णांची माहिती अपडेट केलेली नाही. त्यामुळेच करोनामुक्त झालेल्यांनाही करोनाबाधित म्हणून फोन केले जात आहे. करोनाची लागण झालेली असताना कोणी फोन करुन चौकशी केली नाही. आता आमचे नातेवाईक करोनावर मात करुन घरी परतल्यानंतर फोनवर फोन येत असल्याची तक्रार करोना रुग्णांच्या नातेवाईकांनी केलीय. दुसरीकडे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजय भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार करोनामुक्त झालेल्या रुग्णांना पोस्ट कोव्हिड माहिती देण्यासाठी कॉल केले जात असल्याचं म्हटलं आहे. करोनामुक्तीनंतर ज्या रुग्णांना त्रास होत आहे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी हे फोन कॉल केले जात असल्याचा दावा डॉ. भटनागर यांनी केलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus in up lucknow call from covid helpline number after patient death scsg