लाहोरमधील शादमन चौकाला भगत सिंहांचं नाव देण्याची मागणी तेथील जिल्हा प्रशासनाने फेटाळली आहे. निवृत्त लष्करी अधिकारी तारीक मजीद यांनी दिलेल्या अहवालानंतर हा निर्णय घेतल्याचं जिल्हा प्रशासनाने लाहौरच्या उच्च न्यायालयात सांगितलं आहे. तसेच भगत सिंह यांना दहशतवादी असल्याचेही म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे.
भगतसिंह फाऊंडेशनने काही दिवसांपूर्वी लाहोरमधील शादमन चौकाला भगत सिंहांचं नाव देण्याची तसेच या चौकात भगत सिंह यांचा पुतळा उभारण्याची मागणी लाहोर जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने निवृत्ती लष्करी अधिकारी तारिक मजीद यांच्या नेतृत्वाखील एका समितीची स्थापना केली होती.
या समितीने नुकताच त्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. यात त्यांनी शादमन चौकाला भगत सिंहांचं नाव देऊ नये अशी शिफारस केली. भगत सिंह हे क्रांतीकारी नव्हते, तर ते गुन्हेगार होते. आजच्या भाषेत बोलायचं झाल्यास, ते एक दहशतवादी होते. त्यांनी एका ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्यासाठी त्यांना त्यांच्या दोन सहकाऱ्यांबरोबर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे या चौकाला अशा व्यक्तीचं नाव देऊ नये आणि त्यांचा पुतळा उभारू नये, असे त्यांनी अहवालात म्हटलं.
या अहवालात त्यांनी भगत सिंह फाऊंडेशनवरही गंभीर आरोप केले. या संस्थेचे अधिकारी स्वत:ला मुस्लीम म्हणवून घेतात. पण ही संस्था मुस्लिमांच्या तसेच पाकिस्तानी संस्कृतीच्या विरोधात काम करते आहे. त्यामुळे या संस्थेवर बंदी आणावी, अशी शिफासर त्यांनी या अहवालात केली.
दरम्यान, तारिक मजीद यांच्या या अहवालानंतर आता भगत सिंह फाऊंडेशनच्या कुरेशी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितलं. भगत सिंह यांना क्रांतीकारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे तारिक मजीद यांनी केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो. आम्ही लवकर त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार आहोत. असे ते म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd