रांची : बांगलादेशी नागरिकांच्या कथित बेकायदेशीर घुसखोरी प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग (पीएमएलए)च्या प्रकरणात झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी ईडी (सक्तवसुली संचालनालय)ने छापे टाकले. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधीच केंद्रीय संस्थेच्या रांची कार्यालयाद्वारे दोन्ही शेजारील राज्यांत एकूण १७ ठिकाणी छापे टाकले. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघात बुधवारी तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी ३८ मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, या छापेमारीवरून राज्यातील सत्ताधारी झामुमो आणि काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रांचीतील बरियातू मार्गावरील एक हॉटेल आणि शहरातील एका रिसॉर्टची ईडीच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. या कारवाईवेळी सीआरपीएफचे पथकही उपस्थित होते. या वेळी ईडी पथकाने हॉटेलमधील दस्तावेज, खातेवह्या आणि आर्थिक विवरणाची पडताळणी केली.

ईडीने ‘एक्स’वर जारी केलेल्या निवेदनानुसार, छापेमारीत बनावट आधार कार्ड, पासपोर्ट, शस्त्रे, मालमत्तांचे दस्तावेज, रोख रक्कम, दागिने, प्रिंटिंग पेपर तसेच यंत्र आणि आधार तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा नमुना जप्त केला आहे. दरम्यान, शोध सुरूच असल्याची माहितीदेखील ईडीतर्फे देण्यात आली.

हेही वाचा >>> तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह

संथाल परगणा, कोल्हानमध्ये लोकसंख्येत फरक

झारखंडमध्ये काही बांगलादेशी महिलांची कथित घुसखोरी आणि तस्करीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने सप्टेंबरमध्ये ‘पीएमएलए’अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या वेळी झालेल्या चौकशीत काळा पैशाचा स्राोत उघड झाला होता. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेत्यांनी घुसखोरीला मदत केल्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे. संथाल परगणा आणि कोल्हान विभागातील लोकसंख्येत बदल झाल्याचा मुद्दा भाजपने मांडला होता.

सीमेवर दलाल सक्रिय!

● जूनमध्ये रांचीतील बरियातू पोलीस ठाण्यात दाखल दाखल झालेल्या एका तक्रारीनंतर घुसखोरीचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात ईडीने ईसीआयआर (अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल) सादर केला होता.

● दलालांच्या माध्यमातून भारत-बांगलादेश सीमेतून देशात बेकायदेशीररीत्या घुसखोरी करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी जवळपास सहा महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या महिलांना छाप्यात अटक करण्यात आली होती. ● तक्रारकर्ती महिलेने तिला ब्यूटी सलूनमध्ये नोकरी देण्याच्या नावावर वेश्यावृत्तीसाठी बांगलादेशातून भारतात आणण्यात आले होते, असे तक्रारीत नमूद केले आहे.

● या महिलेकडून पोलिसांनी बनावट आधार कार्ड जप्त केले होते. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता.

● ईडीने हेतुपुरस्सर पारपत्र अथवा प्रवासी दस्तावेज प्राप्त करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे अथवा लपविणे आणि प्रतिबंधित भागात प्रवेशासाठी दंड यासंबंधी गुन्हे दाखल केले.

झारखंडमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी ईडीची कारवाई म्हणजे खोटी कथा तयार करण्याचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. भाजपला बांगलादेशी घुसखोरीचे कथन प्रस्थापित करण्यास मदत करण्याचाही हा प्रयत्न आहे. – मनोज पांडे, प्रवक्ते, झामुमो

ईडीचा हा छापा बांगलादेशी घुसखोरांसाठी नव्हे, तर राज्यातील भाजपचा राजकीय पाया वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न आहे. झारखंडची सीमा बांगलादेशशी सामायिक नाही. भाजपची सत्ता असलेल्या आसामची सीमा बांगलादेशला लागून आहे. – राकेश सिन्हा, प्रवक्ते, काँग्रेस</p>

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed raids in jharkhand west bengal in illegal bangladeshi infiltration case zws