Elon Musk Father On Pahalgam Terror: अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांचे वडील एरोल मस्क यांचा सहा दिवसांचा भारत दौरा नुकताच संपला. यावेळी एरोल मस्क यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला वाईट गोष्ट होती असे म्हटले असून, अशी कृत्ये करणाऱ्यांना थांबवले पाहिजे असही त्यांनी म्हटले.
भारताची दहशतवादाविरुद्धची लढाई आणि पाकिस्तानबरोबरच्या तणावाबद्दल बोलताना एरोल मस्क म्हणाले की, “ही खूप वाईट गोष्ट आहे. जगात मूर्ख लोक आहेत आणि आपल्याला त्यांचे काहीतरी करावे लागेल. ते त्यांच्या मर्जीने वागू शकत नाहीत. त्यांना थांबवले पाहिजे.”
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या अचूक हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत.
एरोल मस्क यांनी त्यांच्या सहा दिवसांच्या भारत दौऱ्यात अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर आणि हनुमानगढी मंदिराला भेट दिली. त्यांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट देणे हे त्यांनी आतापर्यंत केलेल्या “सर्वोत्तम गोष्टींपैकी एक” असल्याचे म्हटले आहे.
…म्हणून मला भारतीय संस्कृती
मस्क म्हणाले होते की, “भारत हे एक अद्भुत ठिकाण आहे आणि शक्य तितक्या जास्त लोकांनी भारतात यावे.” त्यांनी असेही म्हटले की, एलॉन मस्कही लवकरच भारताला भेट देतील.
“मी ज्या देशात येतो त्या देशात बरेच भारतीय आहेत, म्हणून मला भारतीय संस्कृती माहित आहे. भारतीय लोक प्रेमळ आणि दयाळू आहेत, कदाचित तुम्हाला भेटू शकणारे सर्वोत्तम लोक. आमच्याकडे काही स्मार्ट (व्यवसायिक) योजना आहेत ज्यांचा विचार केला जात आहे. मला वाटते की भारत-अमेरिका संबंध खूप चांगले राहतील”, असे एरोल मस्क यांनी म्हटले.
एलोन मस्क जगातील महत्त्वाचे व्यक्ती
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांच्या भारत भेटीच्या शक्यतेबद्दल विचारले असता, त्यांचे वडील म्हणाले, “एलोन मस्क हे आज जगातील एक अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीचे मोजमाप त्यांच्या आर्थिक परिणामाच्या दृष्टीने केले जाते. भारत असे ठिकाण आहे जिथे ते योग्य वेळी पोहोचतील.”
© IE Online Media Services (P) Ltd