पीटीआय, कटरा
‘पहलगाम येथील पर्यटकांना लक्ष्य करून पाकिस्तानने ‘इन्सानियत’ आणि ‘काश्मिरियत’वर हल्ला केला आहे,’ असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ‘देशात जातीय तणाव वाढावा आणि पर्यटनावर आधारित काश्मीरमधील लोकांचा रोजगार हिसकावून घेण्याचा पाकिस्तानचा हेतू होता,’ असा आरोप पंतप्रधानांनी केला. काश्मीर खोऱ्यामधील पहिल्या रेल्वेसेवेचे, चिनाब नदीवरील जगातील सर्वांत उंच रेल्वे पुलाचे, देशातील पहिल्या केबलवर स्थिर असलेल्या अंजी पुलाचे आणि इतर अनेक विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मोदी म्हणाले, ‘पर्यटनामुळे रोजगारनिर्मिती होते आणि लोकांमध्ये दुवा प्रस्थापित होतो. पण, शेजारी देश हा माणुसकीचा, समरसतेचा आणि पर्यटनाचा शत्रू आहे. केवळ इतकेच नव्हे, तर पाकिस्तान हा गरिबांसाठी असलेल्या ‘रोजी-रोटी’चाही शत्रू आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे जे झाले, ते त्याचे उदाहरण होते अशी टीका केली.

‘पर्यटकांना पर्यटनस्थळांची माहिती देणारे , अन्य व्यावसायिक, अतिथीगृहांचे मालक, ढाबाचालक या साऱ्यांना पाकिस्तानला नष्ट करायचे होते. आदिलने (पर्यटकांना घोड्यांवरून घेऊन जाणारा आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मारला गेलेला व्यावसायिक) या दहशतवाद्यांना आव्हान दिले. तोही रोजगारासाठीच इथे होता. ऑपरेशन सिंदूर मोहीम सुरू होऊन आता महिना झाला. ऑपरेशन सिंदूरचे नाव पाकिस्तान जेव्हा-केव्हा ऐकेल तेव्हा पाकिस्तानला लज्जास्पद पराभवाची आठवण होईल असे पंतप्रधानांनी नमूद केले. दरम्यान, सीमेवर राहणाऱ्या नागरिकांचे मोदींनी कौतुक केले. पाकिस्तानच्या हल्ल्यात घरे पूर्ण उद्ध्वस्त झालेल्यांना दोन लाख रुपये, तर कमी नुकसान झालेल्या घरांना एक लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.

दोन अत्याधुनिक पुलांचे उद्घाटन

●पंतप्रधानांनी चिनाब नदीवरील जगातील सर्वांत उंच रेल्वे पुलाचे आणि देशातील पहिल्या केबलवर स्थिर असलेल्या अंजी पुलाचे उद्घाटन केले. हे दोन पूल जम्मू-काश्मीरसाठी समृद्धीची प्रवेशद्वारे होतील, असे मोदी म्हणाले.

●उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे जोड प्रकल्प पूर्ण झाल्यानिमित्त ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा कंदील दाखवला. हा प्रकल्प २७२ किलोमीटरचा असून, ४३,७८० कोटी रुपये खर्च त्यासाठी करण्यात आला आहे.

●या प्रकल्पात ११९ किलोमीटर अंतरावर ३६ बोगदे आणि ९४३ पुलांचा समावेश आहे. याखेरीज, मोदींनी वैष्णोदेवी यात्रेला भेट देणाऱ्या भाविकांसाठी पहिले विश्रांतीस्थान असलेल्या कटरा येथे ४६ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले.

ऑपरेशन सिंदूर मोहीम सुरू होऊन आता महिना झाला. याचे नाव पाकिस्तान जेव्हा-केव्हा ऐकेल तेव्हा त्यांना लज्जास्पद पराभवाची आठवण होईल.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ओमर अब्दुल्लांची खंत

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरला पुन्हा संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी वेगळ्या पद्धतीने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकीर्दीतील शेवटचा कार्यक्रम कटरा येथील रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्याचा होता. याची आठवण करून देऊन जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले, ‘त्या वेळी जे लोक उपस्थित होते, त्यापैकी चार जण आजच्या कार्यक्रमालाही उपस्थित आहेत. राज्यमंत्री जितेंद्रसिंह, नायब राज्यपाल मनोज सिन्हा (तेव्हाचे रेल्वे राज्यमंत्री) तेव्हा उपस्थित होते. माझी मात्र पदावनती झाली आहे. तेव्हा मी संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्याचा मुख्यमंत्री होतो. आता एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे. मात्र, ही स्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही, याची खात्री आहे. तुमच्या मदतीने जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेल्या कटिबद्धतेमुळेच काश्मीरला उर्वरित देशाशी रेल्वेमार्गाने जोडण्यात यश आले आहे. अनेक आव्हाने होती. बोगद्यांचे, पुलांचे जाळे उभारून आपण हे स्वप्न प्रत्यक्षात आणले.

अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री