बिहार सरकारमधून भाजपच्या मंत्र्यांना वगळण्याची शिफारस
नरेंद्र मोदी यांच्या मुद्दय़ावरून भाजपशी फारकत घेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अखेरीस गेली १७ वर्षे भाजपशी युती अखेरीस रविवारी अधिकृतरीत्या संपुष्टात आणली. वर्षभरात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नितीशकुमार यांनी हा निर्णय घेतल्यामुळे बिहार तसेच राष्ट्रीय स्तरावरील एकूणच राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. आपल्या मंत्रिमंडळातील भाजपच्या मंत्र्यांना नारळ देण्याचाही निर्णय नितीशकुमार यांनी घोषित केला असून उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यासह अन्य ११ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शिफारस त्यांनी राज्यपाल डी.वाय.पाटील यांच्याकडे केली आहे. आपल्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यासाठी नितीशकुमार यांनी येत्या १९ जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशनही बोलाविले आहे. दरम्यान, या वेगवान घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर जनता दलाचे (यु) अध्यक्ष शरद यादव यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या निमंत्रकपदाचा राजीनामा आपण देत असल्याची घोषणा केली.
शरद यादव आणि नितीशकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपसमवेत असलेले संबंध संपुष्टात आणत असल्याची घोषणा केली. आमच्या तत्त्वांशी आम्ही तडजोड करू शकत नाही. या निर्णयाच्या परिणामांचीही आम्हाला तमा नाही. बिहारपुरती आघाडी असताना फारसा प्रश्न नव्हता. परंतु आता आमच्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता. जे काही घडले आहे त्याची जबाबदारी आमची नसून हा निर्णय घेण्यास आम्हाला भाग पाडण्यात आले आहे, या शब्दांत यादव नितीशकुमार यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. भाजप आता नवीन टप्प्यातून मार्गक्रमणा करीत आहे. बिहारमधील आघाडीत बाह्य़ हस्तक्षेप नव्हता तोपर्यंत आघाडी व्यवस्थित सुरू होती परंतु हा हस्तक्षेप सुरू झाल्यामुळे समस्या वाढल्या, असे नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळून सांगितले. याआधी, दिवंगत नेते प्रमोद महाजन किंवा अरुण जेटली हे प्रचारप्रमुख होते तेव्हा फारशा समस्या उद्भवल्या नव्हत्या, याकडेही नितीशकुमार यांनी लक्ष वेधले.‘आमची मूलभूत समस्या काय आहे, हे प्रत्येकास ठाऊक आहे’, या शब्दांत नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची आपली आणि आपल्या पक्षाचीही नाराजी स्पष्ट केली. रालोआस केंद्रात सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना आता नवे मित्र शोधावे लागतील. केंद्रातील सत्तेसाठी २७२ खासदारांची आवश्यकता असून कोणत्याही एका पक्षास, कोणाला तरी पंतप्रधान करण्यासाठी हा जादूई आकडा गाठता येणे शक्य नाही. त्यामुळे आपल्या बाजूने एखादी मोठी लाट येईल किंवा आपल्या बाजूनेच लोकमत तयार होईल असे कोणास वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे, असा टोमणा नितीशकुमार यांनी भाजपला मारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

* निर्णयाचे समर्थन
मंत्रिमंडळातून भाजपच्या मंत्र्यांना वगळण्याच्या निर्णयाचेही नितीश यांनी समर्थन केले. या पेचप्रसंगावर सलोख्याने काही तोडगा निघतो का हे बघण्यासाठी सुशीलकुमार मोदी आणि नंदकिशोर यादव या भाजपच्या मंत्र्यांना आपण चर्चा करण्यास बोलाविले होते परंतु हे दोघेही आले नाहीत, असा आरोप नितीशकुमार यांनी केला. भाजपच्या मंत्र्यांनी काम करण्याचे थांबविले असल्याचेही माध्यमांमध्ये चíचले जात होते. अशा परिस्थितीत तुम्ही काम करणार नाही. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांना काढण्याची शिफारस राज्यपालांकडे करण्यावाचून पर्यायही नव्हता, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jdu out of nda