भीषण दुष्काळामुळे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन यावर लोकसभेत चर्चा करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नाना पटोले यांनी सोमवारी केली. मंगळवारी नियम १९३ अंतर्गत राज्यातील दुष्काळावर सभागृहात चर्चा करण्यात यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे केली. लोकसभा अध्यक्षांनी मान्य केल्यास मंगळवारी लोकसभेत राज्याच्या दुष्काळावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
ज्याप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये अतिवृष्टीनंतर आपत्कालीन स्थिती निर्माण होते, तशीच स्थिती राज्यात आहे. त्यामुळे त्यासंबंधी सभागृहात चर्चा व्हावी. बीडच्या प्रीतम मुंडे यांनीदेखील याच मुद्दय़ाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.  भिवंडीच्या कपिल पाटील यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाचा मुद्दा उपस्थित केला. बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ वरून ५ वर जाण्यासाठी कसरत करावी लागते. त्यात अनेकदा रेल्वे गाडी पकडता येत नाही. दोन गाडय़ांमध्ये २५ मिनिटांचा अवधी असल्याने चाकरमान्यांचा विशेषत: महिलांचा खोळंबा होतो. ही संरक्षक भिंत पाडण्याची मागणी कपिल पाटील यांनी केली.
शिवसेनेच्या भावना गवळी यांनी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वडकी गावाजवळ बांधल्या जाणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलास विरोध
केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha to discuss drought of maharashtra says nana patole