Crime News : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे अपहरणाचा चुकीचा आरोप केल्याने एका व्यक्तीने स्वत:चे जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी केलेला तपास हाच संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका कॉलेज विद्यार्थी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात संबंधित व्यक्तीला मुख्य आरोपी ठरवण्यात आले होते. मात्र या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले असून या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो निर्दोष असल्याची बाब समोर आली आहे.

ही घटना उत्तर प्रदेशमधील औरंगाबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असून येथे २ मे रोजी एक बीएची विद्यार्थी असणारी मुलगी अचानक संशयास्पद अवस्थेत बेपत्ता झाली होती. ती गायब झाल्याने गाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीच्या पालकांनी एक स्थानिक २२ वर्षीय तरूण अर्जुन याच्यावर आरोप केले. त्यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप केला गेला, पोलि‍सांनी या तरूणाविरोधात एफआयआर दाखल केला,

पण पाच दिवसांनी ७ मे रोजी, अर्जुनचा मृतदेह गावाजवळच्या एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला तेव्हा या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. पोलि‍सांनी तातडीने ही आत्महत्या असल्याचे म्हटले, दु:खात बुडालेल्या अर्जुनच्या वडीलांनी झालेल्या प्रकाराबद्दल आवाज उठवला.

त्यांनी त्यांचा मुलगा निर्दोष होता आणि तो कोणत्याही मुलीला घेऊन पळून गेला नाही असे सांगितले. त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले, त्याला बदनाम करण्यात आले आणि आता त्याचा जीव गेला आहे. ही आत्महत्या नाही, ही हत्या असून याला आत्महत्या असल्याचे दाखवले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दुसऱ्या व्याक्तीबरोबर सापडली बेपत्ता मुलगी….

अर्जुनच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी कुटुंबाने केली, यादरम्यान बेपत्ता मुलीचा तपास सुरूच राहिला. काही दिवसांनंतर, पोलिसांनी मुलीला औरंगाबाद परिसरातील गिनौरा गावात शोधून काढले, जिथे ती मोहित नावाच्या दुसऱ्या तरुणाबरोबर राहत असल्याचे आढळून आले.

त्या मुलीने तिच्या जबाबात पोलि‍सांना सांगितले की, तिचे अपहरण झाले नव्हते. उलट तीच मोहितबरोबर पळून गेल्याचेही तिने मान्य केले. तसेच दोघांनी मंदिरात लग्न केल्याचेही तिने सांगितले. तिने स्वत:च्या इच्छेने घर सोडले होते आणि या सर्व घटनेदरम्यान तिचा अर्जुनशी कधीही संपर्क झाला नव्हता, असेही तिने स्पष्ट केले.

दरम्यान आता या प्रकरण सुरुवातीला चुकीच्या पद्धतीने हाताळल्या बद्दल पोलिसांवर टीका केली जात आहे. यादरम्यान पोलिसांनी मुलगी बेपत्ता होण्यामध्ये अर्जुनचा काहीही संबंध नव्हता असे सांगितले आहे. तपासादरम्यान अर्जुनला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचे स्पष्ट झाले, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून चुकीचा आरोप केल्याने एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागल्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अर्जुनचा मृत्यू आणि पोलीसांनी सुरूवातीला ज्या पद्धतीने प्रकरण हाताळले त्याची न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी केली जात आहे.