Nitin Gadkari on Tol Tax vs Road Cost : टोल वसुली व रस्त्यांचा दर्जा यावरून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नेहमीच जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. दरम्यान, टोल वसुलीवरून एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोमवारी नितीन गडकरी यांनी रोखठोक भूमिका मांडली. नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता की रस्ता बांधण्यात १,९०० कोटी रुपयांचा खर्च झाल्यास त्याच रस्त्यावरून चालवल्या जाणाऱ्या वाहनांसाठी वाहनधारकांकडून ८,००० कोटी रुपयांचा टोल का वसूल केला गेला? यावर नितीन गडकरी म्हणाले, “टोल वसुली ही काय एका दिवसात केली जात नाही. तसेच रस्त्यांवर इतरही अनेक प्रकारचे खर्च होतात”. यावेळी गडकरी यांनी एक उदाहरण देखील दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीन गडकरी म्हणाले, “तुम्ही एखादं घर किंवा कार रोख रक्कम देऊन खरेदी करता तेव्हा त्या कारची किंमत २.५ लाख रुपये असते. मात्र तीच कार तुम्ही कर्ज काढून खरेदी केलीत आणि ते कर्ज १० वर्षांत फेडलंत तर तुम्हाला त्या कारसाठी ५.५ ते ६ लाख रुपये मोजावे लागतात. या कारसाठी तुम्हाला दर महिन्याला हप्ता भरावा लागतो”. गडकरी हे न्यूज १८ वरील एका कार्यक्रमात बोलत होते.

हे ही वाचा >> Narendra Modi : “इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्सवाला विरोध”, सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून टीकेला मोदींचं प्रत्युत्तर

काय म्हणाले नितीन गडकरी?

दिल्ली-जयपूर महामार्ग म्हणजेच एनएच-८ वर सर्वाधिक टोल वसूल केला जातो. त्यावरून सरकारवर टीका देखील केली जाते. याबाबत गडकरी म्हणाले, “यूपीए सरकारने २००९ मध्ये हा रस्ता बांधण्यास सुरुवात केली होती. यामध्ये नऊ बँका सहभागी होत्या. मात्र हा रस्ता बांधताना अनेक अडचणी आल्या. काही बँकांनी थेट न्यायालयात खटले दाखल केले. त्यानंतर नवीन कंत्राटदार आले. दरम्यानच्या काळात दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झालं. हा रस्ता सहा पदरी करायचा असेल तर अतिक्रमण हटवावं लागेल, यासाठी सरकारला वेगळे प्रयत्न करावे लागले. पावसामुळे कित्येक समस्या उद्भवल्या, त्या समस्या आपल्यालाच दूर कराव्या लागल्या, त्यावरही खर्च झाला”.

हे ही वाचा >> Supreme Court on Bulldozer Action: “दोन आठवड्यांत काय आकाश कोसळणार आहे का?” सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं; बुलडोझर कारवाईबाबत अंतरिम आदेश!

राजस्थानमधील एकाच टोलनाक्यावरून ८,००० कोटी रुपयांचा टोल वसूल

अलीकडेच एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने आरटीआयद्वारे माहिती मिळवली की राजस्थानमधील मनोहरपूर टोल नाक्याद्वारे ८ हजार कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. ज्या एनएच-८ महामार्गावर हा टोलनाका आहे. तो महामार्ग १,९०० कोटी रुपयांमध्ये बांधण्यात आला होता. यावरूनच गडकरींना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना गडकरींनी सगळा हिशेब मांडला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari on nh8 highway built in rs 1900 crores why collected rs 8000 cr toll tax asc