Pakistani National Osama Have Indian Identity: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सकारने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलली असून देशातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर देशभरातील विविध राज्यातील पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेतून पाकिस्तानमध्ये जात आहेत. २४ एप्रिल पासून आतापर्यंत ७८६ पाकिस्तानी नागरिकांनी सीमा ओलांडली आहे. आज ओसामा नावाच्या तरूणाने भारतातून पाकिस्तानमध्ये जाण्यापूर्वी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधत असताना अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्याच्याकडे भारतीय आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदान ओळखपत्र असल्याचा दावा त्याने केला आहे.
काय म्हणाला ओसामा?
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ओसामा म्हणाला की, माझे पदवीचे शिक्षण सुरू असताना मला आता भारतातून जावे लागत आहे, याबद्दल खूप दुःख वाटत आहे. पदवी पूर्ण करून नोकरी मिळविण्याचे माझे स्वप्न आता अधुरेच राहिल. २००८ साली आम्ही भारतात आलो. तब्बल १७ वर्षांपासून मी भारतात राहत असून माझी दहावी, बारावी आणि पुढील शिक्षण इथेच झाले. भारत सरकारने आम्हाला पुन्हा पाठविण्याचा तडकाफडकी निर्णय न घेता थोडा विचार करायला हवा होता.
ओसामा पुढे म्हणाला, “माझ्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र आहे. मी एकदा मतदानही केले. मी इथेच शिक्षण घेऊ इच्छितो. आता पाकिस्तानात गेलो तर मला काहीही करता येणार नाही. तिथे माझे भविष्य नाही.”
ओसामा सारख्या अनेक पाकिस्तानी नागरिकांची अटारी सीमेवर गर्दी झाली असून त्यांनी त्यांचा भारतातील अनुभव कथन केला आहे. पहलगाममधील हल्ल्याबाबत प्रश्न विचारला असता ओसामा म्हणाला की, पहलगाममध्ये झालेला हल्ला मानवतेला कलंक आहे. या हल्ल्यासाठी जे जबाबदार आहेत, त्यांना शोधून कठोर शिक्षा द्यायला हवी.
भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी पाकिस्तानमधील मुली लग्न करून भारतात येत असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, पाकिस्तानी दहशतवादाचा हा नवा चेहरा समोर आला आहे. पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी मुली लग्न करून भारतात आल्या आहेत. आपले शत्रू आतपर्यंत घुसले आहेत, अशावेळी त्यांच्याशी कसे लढायचे? ही परिस्थिती आपल्याला गंभीर इशारा देत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd