PM Modi top 10 quotes from first address on Operation Sindoor india Pakistan tension : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आज (१२ मे) पंतप्रधान मोदी यांनी देशाला पहिल्यांदाच संबोधित केले. या भाषणात नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना स्पष्ट भाषेत संदेश दिला. भारताने केलेल्या कारवाईत अनेक दहशतवादी तळ आणि १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच भारताविरोधात असा कुठलाई दहशतवादी हल्ला सहन केला जाणार नाही, आणि त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल असेही यावेळी मोदी म्हणाले.

१) माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी बाब

“२२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जी क्रूरता दाखवली, त्यामुळे अवघ्या जगाला धक्का बसला. सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेल्या निर्दोष नागरिकांना धर्म विचारून त्यांच्या कुटुंबीयांसमोर, मुलांसमोर निर्दयपणे ठार करणं हा दहशतवादाचा अत्यंत बीभत्स चेहरा होता. क्रूरता होती. देशाच्या भावनेला तोडण्याचा निंदनीय प्रयत्न होता. माझ्यासाठी ही वैयक्तिक पातळीवर प्रचंड वेदनादायी बाब होती.”

२) ऑपरेशन सिंदूर

“आपल्या माता-भगिनींच्या कपाळावरून कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाहीये. हे देशातल्या कोट्यवधि लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे.”

३) १००हून अधिक दहशतवादी ठार

“जेव्हा पाकिस्तानात दहशतवादी तळांवर भारतीय क्षेपणास्त्रांनी, ड्रोन्सनी हल्ला झाला, तेव्हा दहशतवादी संघटनांच्या इमारतीच नाही, तर त्यांचा धीरही डळमळीत झाला….दहशतवाद्यांनी आपल्या भगिनींचं कुंकू पुसलं होतं. त्यामुळेच भारतानं दहशतीची ही मुख्यालयं उद्ध्वस्त केली. या कारवाईत १०० हून अधिक क्रूरकर्मा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे…त्यांना भारतानं एका झटक्यात संपवलं.”

४) भारताने छातीवर वार केला

“पाकिस्ताननं आपल्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तान स्वत: उघडा पडला. जगानं पाहिलं की कशा प्रकारे पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्रं भारतासमोर निष्प्रभ झाले….पाकिस्तानची तयारी सीमेवर वार करण्याची होती. पण भारतानं पाकिस्तानच्या छातीवरच वार केला.”

५) म्हणून शस्त्रविराम

“पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवादी तळांना आपण उद्ध्वस्त केलं. त्यामुळे पाकिस्तानकडून जेव्हा हे म्हटलं गेलं की त्यांच्याकडून यापुढे कोणतीही दहशतवादी कारवाई किंवा लष्करी कारवाई केली जाणार नाही. तेव्हा भारतानंही त्यावर विचार केला.”

६) कारवाई फक्त स्थगित केली

“मी पुन्हा सांगतो, आपण पाकिस्तानच्या दहशतवादी व लष्करी तळांवरील आपली कारवाई फक्त स्थगित केली आहे. येत्या काही दिवसांत आपण पाकिस्तानच्या हालचाली या निकषांवर पाहू की ते काय पाऊल उचलतात.”

७) हीच नवीन पद्धत

“सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर हेच दहशतवादाविरोधात भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरनं दहशतवादविरोधातील लढ्यात एक नवी रेषा, नवी पद्धत निश्चित केली आहे.”

८) सडेतोड उत्तर देणार

“भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर सडेतोड उत्तर दिलं जाईल. आम्ही आपल्या पद्धतीने, आपल्या अटींवर उत्तर देणारच. त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन कठोर कारवाई केली जाईल….”

९) आण्विक हल्ल्याविरोधात स्पष्ट इशारा

“भारत कोणतंही आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही.”

१०) जगाला स्पष्ट भाषेत संदेश

“दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्र नाही चालू शकत. शिवाय पाणी आणि रक्तही एकत्र नाही वाहू शकत. मी आज जागतिक समूहालाही सांगेन, आमचं हे धोरण राहिलं आहे. जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल, तर दहशतवादावरच होईल, पाकव्याप्त काश्मीरवरच होईल.”