Sudi Arabia Bus and Tanker Accident Collision : सौदी अरबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मक्क्याहून मदीन्याला जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला आहे. बस व डिझेल टँकरच्या धडकेत ४२ भारतीय हज यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. भारतीय वेळेनुसार रात्री १.३० वाजता मुफ्रीहाट स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. बस व डिझेल टँकरच्या धडकेमुळे टँकरमधील डिझेल पेटलं त्यातून झालेल्या स्फोटात बसमधील यात्रेकरू व चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत भारतीय प्रवाशांपैकी अनेक जण तेलंगणामधील हैदराबाद शहरातील रहिवासी होते.
हा अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार चालू आहेत. मात्र, जखमींपैकी अनेकजण मोठ्या प्रमाणात होरपळले असून त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. या अपघातानंतर स्थानिक प्रशासन व आपत्कालीन मदत पथकं ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव कार्य चालू केलं.
तेलंगणा सरकार मदतीसाठी पुढे सरसावलं
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या घटनेची माहिती घेऊन राज्याचे मुख्य सचिव के. रामकृष्ण राव व पोलीस महासंचालक बी. शिवाधर रेड्डी यांना तातडीने या घटनेची सविस्तर माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. तेलंगणा सरकार हे परराष्ट्र मंत्रालय व सौदी अरबमधील भारतीय दूतावासाबरोबर मिळून पीडित कुटुंबांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.
पीडित कुटुंबांना माहिती व मदत पुरवता यावी यासाठी तेलंगणा सचिवालयात एका नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. तसेच सरकारने दोन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. 7997959754, 9912919545 या दोन क्रमांकांद्वारे पीडित कुटुंब सरकारशी संपर्क साधू शकतात.
भारताच्या वाणिज्य दूतावासाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
या दुर्घटनेनंतर भारताच्या वाणिज्य दूतावासाने २४X७ नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. वाणिज्य दूतावासाने 8002440003 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. प्रशासन पीडितांची व जखमी यात्रेकरुंची सविस्तर माहिती गोळा करत आहे.
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या दुर्घटनेनंतर सहवेदना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास पीडित कुटुंबांना आणि जखमींना सर्वतोपरी मदत करत आहेत. जखमी यात्रेकरू लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत असल्याचं जयशंकर म्हणाले.
